Young Farmer Dies After Being Hit by Moving Train
पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील गौर शिवारात गुरुवारी (दि. २६) दुपारी २.४० वाजेच्या सुमारास धावत्या रेल्-वेखाली येऊन एका ३५ वर्षीय शेतकरी युवकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गौर गावावर शोककळा पसरली.
कैलास चिंतामणी जोगदंड (वय ३५, रा.गौर, ता.पूर्णा) असे मयत युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कैलास जोगदंड हे गुरुव-ारी सकाळी पूर्णेला जाऊन येतो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र दुपारनंतर पूर्णा-नांदेड रेल्वेमार्गावरील गौर शिवारात ते रेल्वे पटरीजवळ असताना पूर्णेकडून नांदेडकडे जाणाऱ्या पूर्णा-पटणा जलदगती रेल्वेच्या इंजिनला धडकून हा भीषण अपघात घडला.
अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, कैलास जोगदंड यांचा जागीच मृत्यू झाला. सदरील अपघातात शेतकरी युवकाला रेल्वेच्या धडकेचा जबर मार लागल्याचे पहावयास मिळाले आहे. युवक कैलास जोगदंड याच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन डावा हात तुटून पडला होता. रेल्वेच्या धडकेतील अपघातानंतर रेल्वे चालकाने काही अंतरावर रेल्वे थांबवून संबंधित प्रकारणाची माहिती समोरील रेल्वे स्थानक प्रशासनाला ताबडतोब दिली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच चुडावा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत किनगे, फौजदार नारमोड यांच्यासह पोलिस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
या प्रकरणी मयत कैलास जोगदंड यांचे भाऊ गजानन चिंतामणी जोगदंड यांनी दिलेल्या माहितीवरून चुडावा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास बीट जमादार राठोड हे करीत आहेत. मयत जोगदंड यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे गौर गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे.