Turn the entire district saffron: Uddhav Thackeray
परभणी, पुढारी वृत्तसेवा : येणाऱ्या काळात संपूर्ण जिल्हा भगवामय करा. गद्दारी विरुद्ध मशाली पेटल्या पाहिजेत, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणी येथे आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात केले,
शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात खा. संजय जाधव यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. यावेळी पक्षप्रमुख ठाकरे बोलत होते. व्यासपीठावर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खा. संजय राऊत, खा. अरविंद सावंत, खा. अनिल देसाई, माजी खा. चंद्रकांत खैरे, आ. डॉ. राहुल पाटील, माजी आ. मीराताई रेंगे-पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख प्रदीपकुमार खोपडे, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, विष्णू मुरकुटे, महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर, महापौर सय्यद इकबाल, महिला आघाडी जिल्हा संघटक अंबिका डहाळे, कल्याणराव रेंगे-पाटील, आयोध्या पौळ व मान्यवरांची उपस्थिती होती. ६ खासदारांच्या बंडखोरीच्या संदर्भाने बोलतान ठाकरे म्हणाले की, ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली, हा बाळासाहेबांच्या विचाराशी केलेला घात आहे. बंडखोर खाजगी विमानातून कोणाच्या पैशावर फिरतात ? असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. बंडखोर खासदारांच्या संदर्भाने बोलताना ठाकरे म्हणाले, ज्यांना प्रेम दिले, ते माजले. प्रेम ज्यांना परवडत नाही, ते गद्दारी करतात, असेही ठाकरे म्हणाले.
भाजपापेक्षा आज कॉक्रोज जनता पार्टी मोठी झाली आहे. राम मंदिराच्या तिजोरीवर डल्ला मारण्याच्या संदर्भाने भाजपाला राम मंदिर बांधायचे नव्हते तर त्यांना रामाच्या नावाने दुकान उघडायचे होते. परभणीतील आजतागायत सर्वच खासदारांनी बंडखोरी केल्यामुळे गद्दारीची किड हा दुर्दैवी इतिहास झाल्याचेही ठाकरे म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भाने बोलताना ते म्हणाले की, शिंदे यांना मिरवतील आणि उपयोग संपला की फेकून देतील.
याप्रसंगी बोलताना खा. संजय राऊत म्हणाले की, परभणीकरांनी ठाकरेंचे जोरदार स्वागत करून गद्दारांच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. ज्यांनी साधी पिठाची गिरणी आणली नाही, ते काय जिल्हयाचा विकास करणार? असा सवालही खा. राऊत यांनी उपस्थित केला. विकासाच्या गप्पा मारणारे परभणीचे दुबई, सिंगापूर, स्विझरलँड करणार आहेत का? असे राऊत म्हणाले. प्रास्ताविक आ.डॉ. राहुल पाटील यांनी केले. ६ खासदारांनी गद्दारी करून ठाकरेंच्या पाठीत खंजिर खूपसला. स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्यांनी आम्हाला ज्ञान शिकवू नये, असेही आ. डॉ. राहुल पाटील म्हणाले. मेळाव्यास शिवसैनिकांचा उत्स्फूर्ते प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बाळासाहेब राखे यांनी केले.