Thousands of hectares of land will come under irrigation Guardian Minister Meghna Bordikar
जिंतूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर येथील सिंचन भवनात पार पडलेल्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ बैठकीत जिंतूर, सेलू आणि मानवत तालुक्यांतील गावांना पाणीपुरवठा करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे जिंतूर तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला, अशी माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली.
बैठकीस सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा, ऊर्जा, महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आ. अब्दुल सत्तार, आ. विलास भुमरे, विभागीय अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री बोर्डीकर यांनी बैठकीत पुर्णा प्रकल्पातून जिंतूर तालुक्यातील गावांना व सेलू, मानवत तालुक्यातील ५४ गावांना पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली. यावर सकारात्मक चर्चा होऊन लवकरच येलदरी व सिद्धेश्वर धरणाच्या उजव्या कालव्यांचे सर्वेक्षण होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे केवळ सिंचनच नव्हे, तर ऊर्जा निर्मिती, पर्यटन विकास व रोजगाराच्या संधींनाही चालना मिळणार आहे. याशिवाय, सोनपेठ तालुक्यातील जलसंपदा विभागाची जागा क्रीडा संकुलासाठी, तर धाराशिव येथील जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी देण्याचा निर्णयही घेण्यात आला. हिंगोली जिल्ह्यातील सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी सुकळी आणि दिग्रस साठवण तलावांसाठी २२५ कोटींचं अंदाजपत्रक शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. यामुळे परभणी जिल्ह्यातील शेती, पाणीपुरवठा, ऊर्जा आणि पर्यटन क्षेत्रात नवे दालन खुले होणार असून, बळीर- ाजाच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास पालकमंत्री बोर्डीकर यांनी व्यक्त केला.