The tragedy that occurred on Saturday at the Shri Kshetra Yashwadi pilgrimage site in Manwat Taluka has raised serious questions
मानवत, पुढारी वृत्तसेवा : मानवत तालुक्यातील श्रीक्षेत्र यशवाडी देवस्थान येथे शनिवारी घडलेल्या दुर्घटनेमुळे कामाचा दर्जा, कंत्राटदाराची कार्यपद्धती आणि संबंधित यंत्रणांच्या देखरेखीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून यात कंत्राटदाराकडून झालेली अनियमितता समोर आली आहे.
दुर्घटनेच्या दुसऱ्याच दिवशी रविवारी सकाळी प्रशासकीय यंत्रणा आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कोरे, पाथरीचे उपअभियंता गाढवे तसेच पुरातत्त्व विभागाचे अधिकारी अन्सारी यांनी दुर्घटनास्थळाची सखोल पाहणी करत बांधकामाची कागदपत्रे, कामाची सद्यस्थिती आणि गुणवत्तेबाबत माहिती जाणून घेतल्याचे समजते.
यावेळी उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे, देवस्थान समितीचे पदाधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्रिमूर्ती हनुमान मंदिर देवस्थानच्या सभामंडपाचे काम 2022 मध्ये राजस्थान येथील मीनाक्षी मार्बल संस्थेला देण्यात आले होते.
करारानुसार हे काम एका वर्षात पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र तब्बल चार वर्षांचा कालावधी उलटूनही बांधकाम अपूर्ण अवस्थेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे कामाच्या गतीबाबत आणि त्यावरील नियंत्रणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्रिमूर्ती हनुमान मंदिर संस्थानचे अध्यक्ष स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बांधकामासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी जवळपास एक कोटी रुपये संबंधित कंत्राटदाराला अदा करण्यात आले आहेत. मात्र एवढी मोठी रक्कम खर्चुनही काम पूर्णत्वास गेले नाही.
गाभाऱ्याभोवती तारांचे कुंपण
दुर्घटनेनंतर प्रशासनाने तत्काळ सुरक्षेच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. अपूर्ण आणि धोकादायक बांधकामाचा भाग हटविण्यात आला असून मुख्य मूर्ती असलेल्या गाभाऱ्याभोवती तारांचे कुंपण उभारण्यात आले आहे. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंदिरातील दर्शन व्यवस्था तात्पुरती बंद करण्यात आली आहे.