Parbhani Hingoli MLC Election pudhari photo
परभणी

Parbhani Hingoli MLC Election : देशमुखांची उमेदवारी कोणाच्या भरोशावर?

2018ला संख्याबळ असूनही माजी आ. सुरेश देशमुखांचा झाला होता पराभव

पुढारी वृत्तसेवा

परभणी : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी व अपक्ष उमेदवार अशी तिरंगी लढत होत आहे. काँग्रेसचे माजी आ. सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे रंगत वाढली असून पुरेसे संख्याबळ नसतानाही महाविकास आघाडी व अपक्ष उमेदवार सुशील देशमुख ही निवडणूक लढवत आहेत. सुशील देशमुखांची उमेदवारी नेमकी कोणाच्या भरोशावर आहे? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस अगोदर महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर यांना उमेदवारी जाहिर करत महाविकास आघाडीने निवडणुकीत आघाडी घेतल्याचे प्रथामदर्शनी दिसून आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर विजय जामकर व संग्राम जामकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केेले होते.

विधान परिषद निवडणुकीत सर्वाधिक मतदार राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्यामुळे विजय जामकरांची उमेदवारी कायम राहणार, असा अंदाज बांधला जात होता. अखेर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी महायुती सरकारमधील उद्येोगमंत्री उदय सामंत यांनी परभणी येथे येत महायुतीतील मित्र पक्षांची बैठक घेतली. बैठकीनंतर आ. राजेश विटेकर, आ. रत्नाकर गुट्टे यांची नाराजी दूर करत ते संयुक्तपणे पत्रकार परिषदेला सामोरे गेले.

उद्येोगमंत्री उदय सामंत यांच्या शिष्टाईनंतर विजय जामकर, संग्राम जामकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर काँग्रेसचे माजी आ. सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला आहे. आपल्या आयुष्यातील पहिली निवडणूक आपण लढत असून ती जिंकूही असे सुशील देशमुख म्हणाले. देशमुखांनी विजयाची भाषा केली असली तरी विजयासाठी आवश्यक असलेल्या संख्याबळाचा मात्र ऊहापोह केलेला नाही. मागील विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसकडे विजयासाठी आवश्यक असलेले संख्याबळ असतानाही शिवसेनेने अकोला येथून आयात केलेल्या विप्लव बाजोरिया यांनी सुरेश देशमुख यांचा परभव केला होता.

बाजोरिया यांना 256 तर देेशमुख यांना 221 मते मिळाली होती. संख्याबळ असूनही सुरेश देशमुखांना पराभव पत्करावा लागला होता. आजघडीला काँग्रेसकडे 59 मते आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. बाबाजानी दुर्राणी, शहर जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख हे महाविकास आघाडीच्ाा धर्म निभावताना दिसत आहेत. दुसरीकडे माजी खा. ॲड. तुकाराम रेंगे-पाटील, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, माजी शहर जिल्हाध्यक्ष नदिम इूनामदार हे सुशील देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते.

काँग्रेसची मते फुटली तरी विजयाचे गणित मांडणे अवघड असताना सुशील देशमुखांनी केलेला विजयाचा दावा कुणाच्या भरोशावर केल्याचा प्रश्न साहजिकच उपस्थित होत आहे. महायुती व घटक पक्षातील मतदारांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारासह अपक्ष उमेदवाराचाही डोळा असल्याचे दिसून येत आहे. मतदार उमेदवाराचा चांगुलपणा पाहणार की लक्ष्मीअस्त्राला भुलणार? या विषयी नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT