

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (दि. ४) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कमालीची राजकीय धुमश्चक्री पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या हायव्होल्टेज ड्रामा आणि शह-काटशहाचे राजकारण रंगले.
यात बंडखोरी केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने माघारी घेतली, तर भाजपचे बंडखोर गणेश गिते यांनीही अर्ज मागे घेतला. एकूण नऊपैकी ६ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. मात्र, भाजपचे गणेश गिते यांचे बंधू गोकुळ गिते यांनी ऐनवेळी बंडखोरी कायम ठेवल्याने तसेच प्रसाद हिरे यांच्या अपक्ष उमेदवारीने महायुतीची डोकेदुखी वाढली असून, निवडणुकीतील रंगत आता शिगेला पोहोचली आहे.
या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत अर्ज माघारीची मुदत होती. सुरुवातीच्या पहिल्या तासात जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट होता, परंतु जशी दुपारी ३ ची वेळ जवळ आली, तशी राजकीय नेत्यांची आणि समर्थकांची धावपळ सुरू झाली.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे आणि प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांनी अर्ज मागे घेतले. त्यानंतर अपक्ष कुणाल दराडे आणि इस्लाम पार्टीचे मोहम्मद शेख यांनीही माघार घेतली.
दुपारी दोन वाजता शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांच्या उपस्थितीत परवेज कोकणी यांनीही आपला अर्ज मागे घेतला. तीनपर्यंत असलेल्या माघारीच्या मुदतीनंतर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे, अपक्ष गोकुळ गिते, प्रसाद हिरे यांचे अर्ज शिल्लक राहिले. तीन अर्ज शिल्लक राहिल्याने तिरंगी लढत होणार आहे.
राष्ट्रवादीची माघार
महायुतीत राष्ट्रवादीने केलेली बंडखोरी शमविण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आले. राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले गोरख बोडके, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे या दोघांनाही उमेदवारी अर्ज मागे घेतले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोन व उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे हे आपल्या घरी येऊन गेल्यामुळे आपण उमेदवारी अर्ज मागे घेत महायुतीचा धर्म पाळला आहे. अर्ज मागे घेताना कुठलाही शब्द आपण घेतला नसून स्वखुशीने ही माघार घेतली आहे.
महायुतीतील नेत्यांनी विकासकामांना यापुढे सहकार्य करू, असे आश्वासन दिले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना आम्ही पक्षाच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, यांच्याशी चर्चा करूनच उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र महायुतीचा धर्म म्हणून आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे पदाधिकारी गोरख बोडके व विष्णुपंत म्हैसधुणे यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार हिरामण खोसकर, जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक ज्ञानेश्वर लहाने, येवल्याचे माजी नगराध्यक्ष रामदास दराडे उपस्थित होते.