परभणी, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे १० दिवसांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त आहेत, हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही, अशी टीका स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांनी केली.
संभाजीराजे छत्रपती, (Sambhajiraje Chhatrapati) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू, भारतीय जवान किसान पक्षाचे नारायण अंकुशे व अन्य घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकत्रित अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी 'आम्ही शेतकऱ्यांचे आश्रु पुसायला शेतबांधावर आलो आहोत. शेतकऱ्यांना पुढील ८ दिवसांत मदत मिळाली नाही. तर जिल्हाधिकाऱ्यांना खुर्ची बाहेर खेचल्या शिवाय राहणार नाही.' असा इशारा दिला.
प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी 'प्रशासनाने पुढील ८ दिवसांत शेतकऱ्यांना मदत केली नाही, तर आम्ही मोर्चा काढायला देखील मागे-पुढे पाहणार नाही, असे सांगितले.
परभणी व नांदेड जिल्ह्याला अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला. तूर, कापूस, सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करायला हवे होते. परंतु, पुरेशी यंत्रणा नसल्याने अद्यापही काही भागांत पंचनामे झाले नाहीत. परभणी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांचे घरे, जनावरे व घरातील साहित्य वाहून गेले. परंतु, अद्यापही त्यांना कोणतेही सानुग्रह अनुदान मिळालेले नाही.
वझूर गावातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी यावेळी आपल्या व्यथा नेतेमंडळींसमोर मांडल्या. तसेच पाहणी करायला शेतात गेल्यानंतर काही शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध देखील फुटला होता. तिघांनी एकत्रित शेतकऱ्यांना यावेळी धीर दिला. याप्रसंगी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, उपाध्यक्ष माधव देवसरकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाधक्ष किशोर ढगे, अंकुश कदम, आप्पासाहेब कुढेकर, प्रहार पक्षाचे शिवलिंग भोजने, भारतीय जवान किसान पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.