परभणी : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी मध्येही बंडखोरी झाली असून बंडोबांना थांबविण्याचे आव्हान महायुती व महाविकास आघाडीपुढे असणार आहे. गुरुवारी (दि.4) उमेदवारी अर्ज माघारीनंतर निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 465 मतदान आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक 131 मतदार आहेत. त्या खालोखाल भाजपकडे 99 मतदार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेकडे 77 मतदार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे 43 तर महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसकडे 59 मतदार आहेत. आ. रत्नाकर गुट्टे यांच्या यशवंत सेनेकडे 27 तर जूनसुराज्य पक्षाकडे 13 मतदार आहेत.
महायुती व महाविकास आघाडीमध्ये सरळ लढत होईल, असे चित्र असताना युती व आघाडीमध्येही बंडखोरांनी बंडखोरी केली असून या बंडोबांना थांबविण्याचे आव्हान महायुती व महाविकास आघाडीपुढे असणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय जामकर यांच्यासह संग्राम जामकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
विजय जामकर यांच्या समवेत आकाश लहाणे, अर्जुन सामाले, अक्षय देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य असलेल्या संग्राम जामकर यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विजय जामकर यांची उमेदवारी कायम राहिली तर ती महायुतीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे माजी आ. सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सुशील देशमुख यांच्या समवेत माजी खा. ॲड. तुकाराम रेंगे-पाटील, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, नदिम इनामदार यांची उपस्थिती होती. दुसरीकडे भाजपचे नगरसेवक विश्वजित बुधवंत यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसच्या सुशील देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विधान परिषदेची निवडणुक ही आपल्या आयुष्यातील पहिलीच निवडणुक असून ती आपण ताकदीने लढणार असल्याचे सांगीतले.
यामुळे सुशील देशमुख, विजय जामकर यांची उमेदवारी कायम राहणार काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. तसे झाले तर महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मताचे गणित बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. महायुतीचे उमेदवार सईद खान यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. राजेश विटेकर, महायुतीचे सहयोगी सदस्य आ. डॉ. रत्नाकर गुट्टे गैरहजर राहिले. यामुळे आ. विटेकर, गुट्टे यांच्या मनात काही वेगळेच चालले आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. विधान परिषद निवडणुकीत आ. विटेकर आणि आ.गुट्टे यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.
डॉ.मधुसूदन केंद्रे काय बॉम्बगोळा टाकणार?
गंगाखेडचे माजी आ.डॉ. मधुसूदन केंद्रे, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.5) सकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत. माजी आ.डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्या सुविद्य पत्नी उर्मिला केंद्रे गंगाखेडच्या नगराध्यक्षा आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ.मधुसूदन केंद्रे पत्रकार परिषद घेत असल्यामुळे ते पत्रकार परिषदेतून काय बॉम्बगोळा टाकणार? या विषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.