पूर्णा : शहरातील रेल्वे स्थानक परिसरात मुख्य रस्त्यालगत नाल्यावर उभारण्यात आलेल्या अतिक्रमणांवर मंगळवारी (दि.24) दुपारी पालिका प्रशासनाने धडक कारवाई करत बुलडोझर फिरवला. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार पार पडलेल्या मोहिमेत खानावळी, हॉटेल्स, पानटपऱ्या व इतर दुकाने हटविली. संपूर्ण कारवाई कडक पोलीस बंदोबस्तात पार पडली.
महावीर नगर येथील रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 समोरील संरक्षण भिंतीलगत अनेक व्यावसायिकांनी काही वर्षांपासून नाल्या व रस्त्याच्या कडेला अनधिकृत दुकाने उभारली. या अतिक्रमणांमुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. नागरिकांच्या तक्रारीनंतर पालिका प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली.
मोहिमेपूर्वी पालिकेने शहरभर ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देत अतिक्रमणधारकांना स्वखर्चाने दुकाने हटविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार काहींनी सकाळी स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली होती. मात्र दुपारी अचानक पालिका अधिकारी व मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने उर्वरित अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली.
कारवाई दरम्यान एका अतिक्रमणधारकाने न्यायालयाचा स्थगिती आदेश असल्याचे सांगत कारवाई थांबवण्याची विनंती केली, मात्र प्रशासनाने त्यास दाद न देता मोहीम सुरूच ठेवली. अतिक्रमणातील साहित्य ट्रॅक्टरमध्ये टाकून जागा मोकळी केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीत ही कारवाई शांततेत पार पडली.
दरम्यान या कारवाईकडे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पालिकेच्या या धडक मोहिमेमुळे शहरातील इतर अतिक्रमण धारकांतही भीतीचे वातावरण निर्माण झाले, सार्वजनिक जागा मोकळी करण्यासाठी प्रशासन आणखी कारवाया करणार असल्याची चर्चा आहे.