हळद उत्पादक शेतकऱ्यांनाही पीकविमा संरक्षणाचा लाभ मिळावा, अशी मागणी आ.डॉ. राहुल पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. pudhari photo
परभणी

MLA Rahul Patil : जिल्‍ह्यातील शेतकर्‍यांना पीकविम्‍याचा लाभ द्या

Parbhani turmeric crop insurance : निम्‍न दुधना, जायकवाडी प्रकल्‍पातून पाणी सोडा : आ. डॉ. राहुल पाटील यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

परभणी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सन २०२६-२७ मध्ये परभणी तालुक्यातील मृग व अंबिया बहरातील अधिसूचित फळपिकांना लागू करण्यात आली आहे. हळद उत्पादक शेतकऱ्यांनाही पीकविमा संरक्षणाचा लाभ मिळावा, अशी मागणी आ.डॉ. राहुल पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. आ.डॉ. पाटील यांच्या वतीने शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परभणी तालुक्यात मागील काही वर्षांपासून हळद पिकाखालील क्षेत्रात सातत्याने वाढ होत असून, यावर्षी तब्बल २ हजार १४२ शेतकर्‍यांनी १ हजार ३९२ हेक्टर क्षेत्रावर हळद पिकासाठी सन २०२६-२७ मध्ये विमा संरक्षण घेतले आहे. मात्र चालू खरीप हंगामात जून व जुलै महिन्यात सातत्याने कमी पाऊस झाला.

सरासरी २४७ मि.मी. पावसाच्या तुलनेत केवळ ७७.६ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, परभणीतील हळद पिकाला आवश्यक त्या प्रमाणात पाणी उपलब्ध झालेले नाही. पावसाअभावी हळद पिकांची वाढ मोठ्या प्रमाणावर खुंटली असून, अनेक ठिकाणी पिके वाळून जाण्याच्या स्थितीत आहेत. परिणामी शेतकर्‍यांच्या उत्पादनावर मोठा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून, शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

वाढता उत्पादन खर्च, मजुरी, खत, औषधे व इतर निविष्ठांच्या खर्चामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत असताना पावसाच्या अनियमिततेमुळे त्यांच्यावर आणखी मोठे संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर, शासनाच्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेवर विश्वास ठेवून विमा हप्ता भरलेल्या शेतकर्‍यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपासून वंचित ठेवणे अन्यायकारक ठरेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

परभणी तालुक्यातील सद्यस्थितीचा तातडीने पंचनामा करून हवामान व पीक परिस्थितीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करण्यात यावे. तसेच योजनेतील प्रचलित नियम व अटी शिथिल करून सन २०२६-२७ मधील फळपीक विमा व हळद पीक विमा भरलेल्या सर्व पात्र शेतकर्‍यांना विशेष बाब म्हणून विमा संरक्षण व नुकसानभरपाईचा लाभ देण्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी आ.डॉ. राहुल पाटील यांनी केली आहे.

खरीप पिकांसाठी तत्‍काळ पाणी सोडा

परभणी जिल्ह्यात चालू खरीप हंगामामध्ये शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, पिके वाचविण्यासाठी निम्न/दुधना प्रकल्प तसेच जायकवाडी प्रकल्पाच्या माध्यमातून डाव्या कालव्यात व नदीपात्रात तात्काळ पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी यावेळी आ.डॉ. पाटील यांच्या वतीने करण्यात आली. यंदाच्या खरीप हंगामात पावसाने मोठा खंड दिल्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करून शेतकर्‍यांच्‍या हितासाठी तातडीने पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे आ.डॉ. राहुल पाटील यांनी म्हटले आहे. संबंधित प्रकल्पांमधून डाव्या कालव्यात आवश्यक प्रमाणात पाणी सोडण्यात यावे अशी मागणी केली.

यावेळी महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख अंबिका डहाळे, उपजिल्हा प्रमुख संजय गाडगे, माजी शहरप्रमुख अनिल डहाळे, कृउबा सदस्य अरविंद देशमुख, शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार, माजी जिल्हाप्रमुख संदीप भंडारी, रविंद्र पतंगे, नगरसेवक बबलु घागरमाळे, रामराव डोंगरे, संदीप झाडे, बाळराजे तळेकर, विशु डहाळे, दत्तराव मुळे, संभानाथ काळे, वंदना कदम, दगडु काळदाते, शिवलिंग बोधणे, सुशील नर्सीकर, देवेंद्र देशमुख, गणेश मुळे, महेश येरळकर, लखन पवार, उध्दव गरूड, रामा कदम, विठ्ठल धस, रामप्रसाद जोगदंड, हनुमान भालेराव, श्रीकांत भालेराव, अक्षय भराडे, बाळासाहेब गरूड, कैलास पतंगे, रमेश शेरे, दामोधर सानप, विनोद कदम उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT