Flood damage to crops in Tadkals
ताडकळस: तालुक्यातील ताडकळस व परिसरात गेल्या महिनाभरापासून सतत पावसाची हजेरी असून, गेल्या दोन दिवसांत तर मुसळधार पावसाने कहर केला आहे. गुरुवारी (दि. ११ सप्टेंबर) सकाळी तब्बल दोन तास जोरदार पाऊस झाला, तर शुक्रवारी (दि. १२ सप्टेंबर) दुपारपासून संध्याकाळपर्यंत पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली.
या सततच्या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले असून परिसरातील शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. हाताशी आलेली उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. पिकांच्या वाढीला अडथळा निर्माण होऊन पिके पिवळी पडली असून काही ठिकाणी अतिपावसामुळे जमीनही खरडली गेली आहे.
नगदी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचा वर्षभराचा आर्थिक आधार धोक्यात आला आहे. "पिकेच नाहीशी झाली तर संसार कसा चालवायचा?" असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. सध्या ताडकळस मंडळात अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीबाबत शासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.