Parbhani Student Protest 1972: आमदाराची गाढवावरून मिरवणूक काढली अन् परभणीला मिळाले कृषी विद्यापीठ  File Photo
परभणी

Parbhani Student Protest 1972 : आमदाराची गाढवावरून मिरवणूक काढली अन् परभणीला मिळाले कृषी विद्यापीठ

महाराष्ट्रात राहुरी आणि अकोला येथे कृषी विद्यापीठ होते. मराठवाड्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे, या मागणीसाठी आंदोलने सुरू झाली.

पुढारी वृत्तसेवा

Parbhani Student Protest 1972

उमेश काळे

परभणी हा 1972 च्या काळात मागास असलेला जिल्हा. तेव्हा परभणीला कृषी महाविद्यालय होते. परभणीत कृषी विद्यापीठ व्हावे, अशी मागणी जोर पकडत होती. त्यासाठी तत्कालिन युवा नेते, माजी मंत्री गणेशराव दूधगावकर यांच्या नेतृत्त्चाखाली मोठा मोर्चाही निघाला होता. जिल्हाभर आंदोलनांनी जोर पकडला होता. पण शासन या मागणीबाबत फiर अनुकूल नव्हते.

महाराष्ट्रात राहुरी आणि अकोला येथे कृषी विद्यापीठ होते. मराठवाड्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे, या मागणीसाठी आंदोलने सुरू झाली. त्याकरिता स्थापन झालेल्या विद्यार्थी कृती समितीने मुंबईत आमदारांसोबत बैठक घेण्याचे ठरविले. या बैठकीचे निमंत्रण तेव्हा असणार्‍या विभागातील 46 आमदारांना देण्यात आले, प्रत्यक्षात पाच सहा आमदार बैठकीला आले. परिणामी सरकारवर जो दबाव पडावयास हवा होता, तो पडला नाही. तसेच कृषी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना रूम सोडण्यास सांगण्यात आले होते. अन्य महाविद्यालयातील विद्यार्थी आपापल्या गावाकडे परतले होते. त्यामुळे आंदोलनात काहीसे शैथिल्य आल्याचे वाटत असले तरी आंदोलनकारी विद्यार्थ्यांचा जोश कमी झाला नव्हता.

रेल्वे डब्यात विद्यार्थी घुसले

फेब्रुवारीचा महिना होता. वसतिगृहात जे काही दहा पंधरा विद्यार्थी रहात असत, त्यांना एके दिवशी वसमतचे आमदार इकबाल हुसेन हे रात्री एलोरा रेल्वे एक्सप्रेसने मुंबईला जाणार असल्याचे कळाले. ही रेल्वे परभणीहून जात असल्याने विद्यार्थ्यांचा एक गट स्टेशनवर पोहचला आणि रेल्वे आल्यानंतर कोचमध्ये शिरला. त्यांनी आमदारांना आपली ओळख सांगितली आणि उद्या मोर्चा असल्याने आपण त्यात सहभागी व्हावे, अशी विनंती केली. तोपर्यंत त्यांच्या बँगा एका कार्यकर्त्याने खाली डब्यातून खाली उतरविल्या. पोलिसांना या प्रकाराची गंधवार्ताही नव्हती. आमदार हुसेन यांना विद्यार्थ्यांनी वसतिगृहात नेले. दरम्यान पोलिसांना ही माहिती कळाल्यानंतर पहाटे पोलिस वसतिगृहात आले. तेथे प्राचार्य एल. श्रीनिवास आले होते. पोलिस आपल्या परवानगीशिवाय कसे काय आले असा सवाल त्यांना विद्यार्थ्यांनी केला. प्राचार्यांनाही काही कळेना, तोपर्यंत पोलिसांनी आम्हाला आमदारांशी बोलयाचे आहे, असे सांगितले. त्यावर विद्यार्थ्यांनी आमदार स्वत:हून आले आहेत, त्यांचे आम्ही काही अपहरण केले नाही, असे सांगितले. आपले म्हणणे खरे आहे असे वाटावे म्हणून आ. हुसेन यांनीसुद्धा गॅलरीतून चिठ्ठी फेकली आणि मला विद्यार्थ्यांनी पळवून आणले नसून स्वेच्छेने आलो असल्याचे त्यात नमूद केले होते.

गाढवावर विराजमान

दुसर्‍या दिवशी आमदारांना हॉटेलमध्ये चहा, नाश्ता देण्यात आला. मुलींचा एक गट बसस्टँडकडून येणार आहे, तो आला की आपण मोर्चाचे नेतृत्त्च करा, असे विद्यार्थी म्हणाले. यावेळी काही विद्यार्थ्यांनी गाढवाला सजवून आणले. गाढव समोर आल्यावर आपले काय होणार हे आमदारांच्या लक्षात आले. पण ते शांत, सयंमी होते. ते स्वत:हून गाढवावर बसले, त्यांच्या हातात गढूळ पाण्याची बाटली देण्यात आली, तोंडाला काळे फासण्यात आले, पादत्राणांची माळ गळ्यात घालण्यात आली..आणि गर्दभराजावर मिरवणूक निघाली. अगोदर लोकांना वाटले की, एखाद्या विद्यार्थ्याला गाढवावर बसविले की काय..पण जेव्हा आमदार असल्याचे कळाल्यानंतर गर्दी वाढली. समोर डफडेवाला, घोषणाबाजी करीत मिरवणूक स्टेशन परिसरातून शिवाजी चौकाकडे निघाली. जिल्हा पोलिस अधीक्षक आकाशी व पोलिसांचा ताफा तोपर्यंत दाखल झाला. एसपींनी वायरलेसवरून मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याशी संपर्क साधला व आंदोलनाची माहिती दिली. तेव्हा नाईक खवळले, एका आमदाराची गाढवावरून मिरवणूक निघते आणि पोलिस काय करतात असा सवाल त्यांनी केला. पण आमदार गाढवावरून उतरण्यास तयार नव्हते. त्यांनी नाईक यांनाच कळविले की, कृषी विद्यापीठ हा मराठवाडा विकासाचा विषय आहे, या मागणीला माझा पाठिंबा आहे.

या आंदोलनात सहभागी झालेले तेव्हांचे कार्यकर्ते एन. पी. दराडे म्हणाले, की विद्यार्थ्यांनी जरी अवमानास्पद वागणूक दिली तरी, आ. हुसेन यांनी दिलेली साथ मोलाची वाटते. मराठवाडा विकासाकरिता जे काही प्रयत्न करता येतील, असे आश्‍वासन त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. इकबाल हुसेन यांचा विजय असो, कृषी विद्यापीठ घेणारच अशा घोषणा नंतर देण्यात आल्या. या मिरवणुकीची दुसर्‍या दिवशीच्या वर्तमानपत्रात ठळक बातमी आली.

विधानसभेतही चर्चा

कृषी विद्यापीठाच्या मागणीसाठी कृषी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची चर्चा विधानसभेतही झाली. मृणाल गोरे, रामभाऊ म्हाळगी, शेषराव देशमुख, ए. पी. साळवे, दि. वि. पुरोहित आदी आमदारांनी याबाबत प्रश्‍न विचारले होते. त्यावेळी कृषी झालेल्या कृषी स्पर्धांत निकालावरून हाणामार्‍या झाल्या. परिणामी परभणीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाला प्रारंभ केला व पुढे विद्यापीठाची मागणी केली, असे उत्तर तत्कालिन कृषी मंत्री शंकरराव चव्हाण यांनी दिले. एकूणच तेव्हा (मार्च 1972) झालेल्या चर्चेत सभागृहाने मराठवाड्यावर अन्यात होत असल्याचे जवळपास मान्य केले होते.

आंदोलनाची तीव्रता लक्षात घेत तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी अखेर विद्यापीठ स्थापनेस मंजुरी दिली. 18 मे, 1972 रोजी परभणीत कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाचे प्रारंभीचे नाव मराठवाडा कृषी विद्यापीठ असे होते, काही वर्षांपूर्वी त्याचे नामकरण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असे करण्यात आले, हा योगायोग.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT