Animals killed in fire Parbhani
परभणी : शहरातील खंडोबा बाजार परिसरात उभ्या असलेल्या एका टेम्पोला शनिवारी (दि.१६) दुपारी अचानक भीषण आग लागल्याने टेम्पोमधील तीन जनावरे होरपळून मृत्युमुखी पडली. या आगीत वाहनाचेही मोठे नुकसान झाले. दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, खंडोबा बाजार परिसरात एक टेम्पो उभा असताना त्यातून अचानक धूर निघू लागला. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. टेम्पोमध्ये म्हशीचे तीन वधारू बांधलेले होते. आग वेगाने पसरल्याने जनावरांना बाहेर काढण्यास वेळ मिळाला नाही. त्यामुळे तिन्ही जनावरे आगीत होरपळून मृत झाली.
घटनेची माहिती मिळताच मनपा सदस्य गुलमीर खान यांनी तातडीने अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी दिपक कानोडे, रोहित गायकवाड, उमेश कदम आणि संतोष मुदीराज यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली.
मात्र, तोपर्यंत टेम्पो आणि त्यातील जनावरांचे मोठे नुकसान झाले होते. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी वाढत्या तापमानामुळे वाहनांच्या इंजिनमध्ये बिघाड होणे किंवा शॉर्टसर्किटमुळे अशा घटना घडत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता वाढली असून, उन्हाच्या झळा नागरिकांना असह्य होत आहेत. यामुळे वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे.
काही दिवसांपूर्वी ताडबोरगावजवळही एका चारचाकी वाहनाला आग लागल्याची घटना घडली होती. त्यामुळे वाहनधारकांनी उन्हाळ्यात वाहनांची नियमित तपासणी करावी, अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात येत आहे.