Selu Death Case
सेलू : शहरातील गायत्रीनगर परिसरात १६ एप्रिलरोजी किरकोळ वादातून चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपीसह अन्य दोन आरोपी गेल्या ४५ दिवसांपासून फरार असून त्यांना अद्याप अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. यामुळे संतप्त झालेल्या मृत आदित्य प्रधान यांच्या कुटुंबीयांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी (दि. ५) पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
गायत्रीनगर येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आदित्य प्रधान यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेला दीड महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला असला तरी मुख्य आरोपीसह इतर दोन फरार आरोपींचा शोध लागलेला नाही. या प्रकरणात एकूण सात आरोपी असून त्यापैकी चार आरोपींना अटक करून जिल्हा कारागृहात पाठविण्यात आले आहे. मात्र उर्वरित तीन आरोपी अद्याप फरार आहेत.
मृताच्या कुटुंबीयांनी वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडे फरार आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. मात्र, पोलीस प्रशासन केवळ वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे.
मुख्य आरोपीसह इतर दोन फरार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, मृत आदित्य प्रधान यांची आई प्रतिमा मिलिंद प्रधान यांनी आमरण उपोषण सुरू केले असून या आंदोलनास गायत्रीनगर परिसरातील नागरिकांनी पाठिंबा दर्शविला आहे.