मानवत : रस्त्यावर धोकादायकरित्या उभ्या असलेल्या हायवाला पाठीमागून मोटारसायकल धडकून भीषण अपघात झाला. यामध्ये तालुक्यातील रामेटाकळी येथील महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. केकरजवळा ते पाथरी रोडवरील चारीजवळ शुक्रवारी (२६ जून) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
विष्णू पांडुरंग गयाळ (३९, रा. नाव्हा, ता. पालम, ह. मु. पाथरी) असे अपघातात मृत झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते मानवत तालुक्यातील रामेटाकळी येथील वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनवरून आपली ड्युटी संपवून दुचाकीने (क्र. एमएच २२ ए यू ९४०८) पाथरी येथील घराकडे निघाले होते. दरम्यान, केकरजवळा-पाथरी रोडवरील चारीजवळ वाळूने भरलेला हायवा ट्रक (क्र. एम एच २१ एक्स ६२१३) नादुरुस्त झाल्यामुळे रस्त्यावरच उभा होता. रात्रीच्या वेळी अंधार असल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या या हायवाचा अंदाज दुचाकी चालक गयाळ यांना आला नाही. त्यामुळे त्यांची दुचाकी थेट हायवावर जाऊन पाठीमागून जोरात धडकली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्त्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला.
अपघात घडताच आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली, नागरिकांनी त्वरित रुग्णवाहिकेला फोन करून पाचारण केले. घायाळ यांना तात्काळ पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.