Purna Suhagan Village Agitation
पूर्णा : पूर्णा तालुक्यातील सुहागण ग्रामपंचायतीमार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) करण्यात आलेल्या मातोश्री पांदण रस्ता कामात आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. योगेश भोसले आणि खुशाल भोसले यांनी सोमवार (ता. ६) पासून उपोषणाला सुरुवात केली आहे.
उपोषणकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित रस्ता कामात आर्थिक अपहार, बनावट कागदपत्रांचा वापर आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत ६ एप्रिल २०२६ रोजी गटविकास अधिकाऱ्यांकडे (बीडीओ) तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत पंचायत समितीने चौकशी समिती नेमून सात दिवसांत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
मात्र, आदेशानंतर दीड महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी पूर्ण केली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. तसेच लेखापरीक्षण अहवालही उपलब्ध करून देण्यात आलेला नसल्याने अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पूर्णा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण मिसाळ म्हणाले, "उपोषणकर्त्यांच्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित मातोश्री पांदण रस्ता कामाची सखोल चौकशी करण्यात येईल. चौकशी पूर्ण करून येत्या दहा दिवसांत अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येईल."
सुहागण ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रतिनिधी दाजीबा भोसले यांनी भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, "लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. संबंधित पांदण रस्त्याचे काम नियमानुसार आणि रितसर करण्यात आले असून त्यामध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. मात्र आगामी ग्रामपंचायत निवडणुका लक्षात घेऊन ग्रामविकासाची चांगली कामे बदनाम करण्यासाठी खोडसाळपणे षडयंत्र रचले जात आहे."