Prahar Divyang Protest
पूर्णा : दिव्यांग, निराधार आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सोमवारी (दि. २४ ) पूर्णा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. दुपारी १२ वाजता ताडकळस टी-पॉईंट येथून शेकडो दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत हा मोर्चा वाजतगाजत तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी निराधार महिला, शेतकरी तसेच प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रहारचे शिवहार सोनटक्के, श्रीहरी इंगोले, विष्णू बोकारे, श्याम सोनवणे, राम सुके, रहीम, चंपत कदम, अंकुश शिंदे, लक्ष्मण शिंदे आणि रुंजकर कलम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
सहा महिन्यांपासून मानधन रखडल्याचा आरोप
पूर्णा तालुक्यातील अनेक दिव्यांग आणि निराधार लाभार्थ्यांना मागील सहा महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले असून उपासमारीची वेळ आल्याचे प्रहार संघटनेने म्हटले.
अनेक दिव्यांग बांधवांना शारीरिक अडचणींमुळे काम करणे शक्य नाही. अशा परिस्थितीत शासनाकडून मिळणारे मानधनही वेळेवर मिळत नसेल, तर दिव्यांगांनी उदरनिर्वाह कसा करायचा, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. शासनाने केवळ कागदोपत्री योजना न राबवता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर मानधन नियमितपणे आणि वेळेत जमा करावे, अशी मागणी करण्यात आली.
दिव्यांग शेतकऱ्यांच्या जमीन मोजणीचा प्रश्न
याशिवाय मुंबर येथील ८० टक्के दिव्यांग शेतकरी अंकुश माधवराव शिंदे व लक्ष्मण शिंदे यांच्या मालकीच्या मौजे गोळेगाव शिवारातील गट क्रमांक १९४ व १९५ मधील जमिनीच्या मोजणीचा प्रश्नही मोर्चादरम्यान उपस्थित करण्यात आला.
संबंधित शेतकऱ्यांनी जमीन मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे आवश्यक शुल्क भरले असतानाही अद्याप जमिनीची मोजणी आणि चतुःसीमा निश्चित करण्याची कार्यवाही पूर्ण झालेली नसल्याची तक्रार करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार जमीन मोजणी करावी, चतुःसीमा निश्चित करावी आणि संबंधित दिव्यांग शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी प्रहार संघटनेने केली.
“अन्याय झाल्यास प्रहार गप्प बसणार नाही”
यावेळी प्रहारचे तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, तालुक्यातील कोणत्याही दिव्यांग किंवा निराधार व्यक्तीवर अन्याय झाल्यास प्रहार संघटना गप्प बसणार नाही. दिव्यांग, निराधार आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.
मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार प्रशांत थारकर, नाईक तसेच भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. संबंधित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.