पाथरी, पुढारी वृत्तसेवा : ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी बीड या बँकेच्या पाथरी शाखेकडून ठेवीदारांना खात्यावरील ठेवी देण्यास टाळटाळ केली जात आहे. त्यामुळे खातेदारांनी आज (दि. ७) पासून पाथरी तहसील समोर बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे.
तालुक्यातील हादगाव बु., कासापुरी, शिमूरगव्हाण येथील शेतकरी या बँकेचे खातेदार आहेत. या खातेदारांनी पाथरी शाखेत बचत खात्यामध्ये पैसे जमा केलेले आहेत. ही बँक मागील एक महिन्यापासून बंद झाली आहे. बँक चालू असताना खातेदारांनी बँकेकडे वारंवार पैशाची मागणी केली होती. परंतु, खातेदारांना त्यांच्या हक्काचे पैसे देण्यास टाळाटाळ केली जात होती.
खातेदारांनी बँकेत मुलांचे शिक्षण, लग्न, शेती, घरासाठी आपली पूंजी ठेवली होती. त्यामुळे तहसीलदार यांनी खातेदारांचे पैसे देण्याचे आदेश बँकेला द्यावेत, अशी मागणी केली आहे. जोपर्यंत पैसे मिळणार नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा खातेदारांनी दिला आहे.
गणेश निवृत्ती नकाते, रुपेश रमेश नकाते, गंगाधर वैजनाथ लिंगायत, रमेश विठ्ठलराव नकाते, शिवाजी मुरलीधर नकाते, नवल अनिरुद्ध घाटूळ, जय भारत नागोराव वाघमारे, प्रल्हाद पांडुरंग भागीरथ, शेषराव उगले आदी यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा