परभणी

Parbhani civic issues | जिंतूर पालिकेची सार्वजनिक मंगल कार्यालय बांधण्यास अनास्था

खाजगी मंगल कार्यालयांची आर्थिक लूट, सत्ताधाऱ्यांचा व्यापारी गाळ्यांवर भर

पुढारी वृत्तसेवा

जिंतूर : शहराची लोकसंख्या वाढत असताना नागरिकांच्या मूलभूत सामाजिक गरजांकडे स्थानिक प्रशासन आणि नगरपालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. विशेषतः सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणारे सार्वजनिक मंगल कार्यालय उभारण्याबाबत पालिकेची अनास्था दिसून येत असल्याचा आरोप होत आहे.

परिणामी शहरातील खाजगी मंगल कार्यालयांकडून मनमानी दर एका लाख, सव्वा लाख ते दीड ते दोन लाख रुपया पर्यंत भाडे आकारले जात असून सर्वसामान्य कुटुंबांची आर्थिक कोंडी होत आहे. शहरात लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सार्वजनिक स्वरूपाचे सुसज्ज मंगल कार्यालय नसल्याने नागरिकांना खाजगी मंगल कार्यालयांचा आधार घ्यावा लागतो. या ठिकाणी भाडे, वीज, साफसफाई, सजावट आणि इतर सुविधांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर शुल्क आकारले जात असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सर्वसामान्य, शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मुला-मुलींच्या विवाहासाठी लाखो रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. अनेक वेळा केवळ मंगल कार्यालयाच्या भाड्यामुळे कुटुंबांचे आर्थिक नियोजन कोलमडून जात असल्याचे चित्र आहे. दरम्यान, शहराच्या विकासाच्या नावाखाली व्यापारी संकुले (गाळे ) बांधण्याच्या प्रकल्पांना प्राधान्य दिले जात असल्याची चर्चा आहे. महसूल वाढीच्या दृष्टीने व्यापारी गाळ्यांना महत्त्व दिले जात असले तरी सामाजिक सुविधांच्या निर्मितीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. नगरपालिकेने सार्वजनिक मंगल कार्यालय, सभागृह, सांस्कृतिक भवन यांसारख्या लोकहिताच्या प्रकल्पांवर भर देणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, नगरपालिका मालकीचे आधुनिक आणि सुसज्ज सार्वजनिक मंगल कार्यालय उभारल्यास नागरिकांना कमी दरात सुविधा उपलब्ध होतील. तसेच पालिकेलाही नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊ शकतो. अनेक शहरांमध्ये अशा प्रकल्पांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून जिंतूरमध्येही अशाच उपक्रमाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. नागरिकांनी आता नगरपालिकेकडे सार्वजनिक मंगल कार्यालयासाठी स्वतंत्र जागा आरक्षित करून तातडीने बांधकामाचा आराखडा तयार करण्याची मागणी केली आहे. अन्यथा खाजगी मंगल कार्यालयांच्या वाढत्या शुल्कामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक कायम राहील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

जिंतूरमध्ये पालिकेच्या सार्वजनिक मंगल कार्यालयाचा,सांस्कृतिक भवन क्रीडा मैदान आदींचा याच मतदारसंघातील सेलू तालुक्याच्या तुलनेत अभाव दिसून येतो. खाजगी मंगल कार्यालयांकडून मनमानी शुल्कामुळे मुलींच्या सर्वसामान्य वडिलवर प्रचंड महागाईच्या काळात आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. ही सामाजिक हिताची बाब सत्ताधाऱ्यांना कधी समजणार असा प्रश्न पुढे येत आहे. शहराच्या चोहोबाजूने पेव फुटलेल्या खाजगी मंगल कार्यालयाच्या आर्थिक लुटी मुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार वाढत चालला आहे.

पालिकेचा व्यापारी गाळे उभारण्यावर वेळोवेळी अधिक भर असल्याचा आरोप होत आहे.. पालिकेच्या उत्पन्ना साठी व्यापारी गाळ्यास उभारण्यास नक्कीच प्राधान्य द्यावे.पण सामाजिक बांधिलकी नागरिकांच्या मागण्या,खेळाडू साठी मैदान, सांस्कृतिक भवन या साठी नगर पालिका पुढाकार घेईल का हा प्रश्न पडत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT