परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघातील शिवेसना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खा. संजय जाधव यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे खा. जाधव यांच्या मनात चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
एक कडवट शिवसैनिक अशी खा. संजय जाधव यांची प्रतिमा राहिलेली आहे. कुठल्याही आणीबाणीच्या प्रसंगात खा. संजय जाधव यांनी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून नागरिकांना धीर दिलेला आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर खा. जाधव यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये राहणे पसंत केले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यामुळे त्यांनी शिंदे यांच्यावर अनेक वेळा झोंबणारी टीकाही केली होती.
ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून शिवसेनेचे सहा खासदार फुटणार अशा चर्चा होत असताना, त्यात खा. संजय जाधव यांचेही नाव चर्चेत आले होते. ऑपरेशन टायगरविषयी पत्रकारांनी खा. जाधव यांना छेडल्यानंतर त्यांनी ऑपरेशन टायगर फेल असल्याचे माध्यमांना सांगितले होते. शिवसेनेच्या फुटीनंतर अधूनमधून सुरू असलेली चर्चा पुन्हा जोर धरू लागली असून खा. संजय जाधव शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशी कुजबूज कार्यकर्त्यांमधून ऐकू येऊ लागली आहे.
स्वतः खा. जाधव यांनी पुढील निर्णय घेण्यासंदर्भात कार्यकर्त्यांची मतेही जाणून घेतल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. खा. जाधव यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते याविषयी व्यक्त व्हायला तयार नसले तरी खा. जाधव यांच्या प्रवेशाची चर्चा मात्र सुरू आहे. परभणी विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार व लोकसभेत खासदार म्हणून जाधव यांची तिसरी टर्म आहे. शिवसेना शहरप्रमुख ते जिल्हाप्रमुख अशी संघटनात्मक जबादारीही त्यांनी सांभाळलेली आहे.
एक उत्कृष्ट संघटक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. असे असले तरी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाविषयी काही मुद्द्यांवरून त्यांच्यामध्ये मतभेद आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्ष श्रेष्ठींकडून अपेक्षित पाठबळ न मिळाल्यामुळेही नाराजीचा सूर असल्याचे बोलल्या जाते. एकंदरीत खा. संजय जाधव यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशाची चर्चा जोर धरू लागली आहे.
खा. जाधव यांच्या भूमिकेकडे लक्ष
शिवसेनेने आजतागायत परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडून दिलेले खासदार हे इतर राजकीय पक्षात गेलेले आहेत. तदनंतर त्यांना राजकीयदृष्ट्या अडगळीत पडावे लागल्याचे उदाहरणे आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर खा. संजय जाधव काय निर्णय घेतात याकडे कार्यकर्त्यांचेही लक्ष लागले आहे. राजकारणात एक मुरब्बी राजकारणी म्हणून खा. संजय जाधव यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहेच.