परभणी/ धाराशिव : ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडलेल्या परभणीचे खा. संजय जाधव आणि धाराशिवचे खा. ओमराजे निंबाळकर यांनी आपले मौन सोडले असून, समाजमाध्यमावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मातोश्रीचे राखणदार हे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य यांना भेटू देत नव्हते, असा आरोप जाधव यांनी केला असून, भाविनकदृष्ट्या निर्णय चुकीचा वाटत असला तरी राजकीयदृष्ट्या योग्य असल्याचा दावा ओमराजे यांनी केला आहे.
खा. संजय जाधव यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. त्यात मागील ४० वर्षापासून बाळासाहेबांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रानुसार काम करत असल्याचे म्हटले आहे. विकासकामे, त्यासाठी लागणारा निधी या व अन्य कामासाठी मुंबईत मातोश्रीवर गेल्यावर नेत्यांपर्यंत पोहचू दिल्या जात नसे. मातोश्रीची चाकरी करणारे लोक स्वत:ला पक्षप्रमुखापेक्षाही श्रेष्ठ समजून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे घरात असतानाही ते घरी नसल्याचे सांगत. पक्षाचे विरोधी पक्षनेते शहरात बैठकीसाठी आल्यानंतरही आपल्याला निरोप दिला जात नसे. अशी खदखद त्यांनी यात व्यक्त केली.
आदित्य ठाकरे यांच्यावर ओमराजे यांचा रोख
मी मोठ्या धर्मसंकटात अडकलो आहे. हा निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा वाटत असला, तरी मतदारसंघाचा विकास आणि राजकीय भवितव्य लक्षात घेता तो राजकीयदृष्ट्या योग्य आहे, असे खा. ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे. मतदारसंघातील विकासकामांसाठी आवश्यक निधी आणि प्रशासकीय सहकार्य मिळण्यात अडचणी येत होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्त्यांना बळ देणेही कठीण बनल्याने भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत कठोर निर्णयाचा विचार करावा लागत आहे.
पक्ष नेतृत्वाबाबत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची जाणीव असल्याचे सांगितले, मात्र आदित्य ठाकरे यांनी राज्यभर फिरून कार्यकर्त्यांना अधिक बळ देणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही, अशी खंत व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने कार्यकर्त्यांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी नमूद केले.
पक्ष सोडण्यामागे कोणतेही आर्थिक कारण नसल्याचे स्पष्ट करत निंबाळकर यांनी विकासकामांसाठी हा मार्ग स्वीकारण्याची वेळ आल्याचे सांगितले. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा २० जून रोजी लागणारा निकाल आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी म्हटले. त्या निकालानंतर कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांशी चर्चा करून पुढील राजकीय भूमिका जाहीर केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.