Manwat Sword Attack
मानवत : मानवत तालुक्यातील गोगलगाव येथे जुन्या वादातून झालेल्या रक्तरंजित हाणामारी प्रकरणाला गंभीर वळण लागले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विष्णू आत्माराम पाथरकर यांचा सोमवारी (दि. 8) दुपारी 4:30 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला . त्यामुळे आधी मारहाण आणि जीवघेणा हल्ला म्हणून नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यात आता अधिक गंभीर कलमांची भर पडण्याची शक्यता आहे.
गोगलगाव येथे ४ जून रोजी रात्री जिल्हा परिषद शाळेसमोर दोन गटांमध्ये जुन्या वादातून हाणामारी झाली होती. वाहन उभे करण्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान तलवारी, लाकडी दांडके आणि मिरची पावडरच्या हल्ल्यात झाले. या घटनेत गजानन पाथरकर, केशव पाथरकर आणि विष्णू पाथरकर हे तिघे गंभीर जखमी झाले होते.
फिर्यादीनुसार, गोपाळ मगर, कृष्णा मगर, अजय उर्फ आदिनाथ मगर, नवनाथ मगर, आबासाहेब मगर, मनकर्णा मगर आणि सीमा मगर यांनी संगनमत करून हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ल्यादरम्यान विष्णू पाथरकर यांच्या डोक्यावर तलवारीने वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे गोगलगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, जखमीचा मृत्यू झाल्याने मानवत पोलिसांकडून प्रकरणाचा फेरआढावा घेतला जात असून, आरोपींविरुद्ध सदोष मनुष्यवध अथवा खुनासंदर्भातील कलमे लावण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रभारी पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
गोगलगाव येथील तलवारीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विष्णू पाथरकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. सुरुवातीला मारहाण व जीवघेणा हल्ला म्हणून दाखल झालेला आहे. आरोपींवरील कलमांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.