Parbhani Manwat Highway Blockade
मानवत : मराठा आरक्षणाच्या मागणीसह मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मानवत तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी (दि. २) शहरातील महाराणा प्रताप चौकात तब्बल साडेतीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संतप्त आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर टायर जाळून तसेच पर्यायी मार्गावर झाडे टाकल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
मराठा आरक्षणाच्या मागणीला समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाजाचे आंदोलक सकाळी १० वाजता महाराणा प्रताप चौकात एकत्र आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारविरोधात संताप व्यक्त केला. आंदोलनादरम्यान महामार्गावर टायर जाळण्यात आले. तसेच वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या रचना कॉलनी मार्गावर झाडे टाकण्यात आल्याने मुख्य महामार्गासह पर्यायी मार्गावरील वाहतूकही बंद झाली.
रास्ता रोकोमुळे तब्बल साडेतीन तास वाहतूक ठप्प राहिल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. प्रवासी आणि वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
रास्ता रोको आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तहसील प्रशासनाच्या वतीने आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यात आले.
मनोज जरांगे पाटील हे २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा बुधवारी पाचवा दिवस असून प्रकृती खालावत चालल्याचा दावा आंदोलकांनी केला. सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली.
मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.