Manwat Kisan Sabha Agitation
मानवत : २०२४च्या विधानसभा निवडणुकीतील घोषणेप्रमाणे राज्य शासनाने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून तातडीने पीक कर्जाचे वाटप करावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा आणि महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) यांच्या वतीने सोमवारी (१०) मानवत येथे भर रस्त्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या मागण्यांसंदर्भात संघटनेच्या वतीने ३ ऑगस्ट रोजी तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना निवेदन देण्यात आले होते. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने सोमवारी संत सावता माळी रोडवरील जनशक्ती कार्यालयापासून मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी संत सावता माळी चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले.
यावेळी नायब तहसीलदार संजय खिल्लारे यांनी आंदोलकांकडून मागण्यांचे निवेदन स्वीकारले. आंदोलनात लिंबाजी कचरे, अशोक बुरकुंडे, रमेश साठे, अनिल पंडित, राजाभाऊ काकडे, विष्णू जाधव, अशोक बारहाते, बाळासाहेब आळणे, उद्धव पौळ, दादासाहेब देशमुख, दत्ता आळणे, गुलाब शेख, देविदास शिंदे, बाबाराव आळणे, लिंबाजी धनले यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व महिला सहभागी झाले होते.
१. २०२४च्या विधानसभा निवडणुकीतील घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून तातडीने पीक कर्ज वाटप करावे. वन-टाईम सेटलमेंट केलेल्या शेतकऱ्यांनाही तातडीने पीक कर्ज द्यावे.
२. देशाच्या हिताला बाधक ठरणारे व्यापार करार रद्द करावेत. चालू बाकीदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर दोन लाख रुपये देऊन पीक कर्ज वाटप करावे.
३. बीव्हीबी ग्रामजी कायदा रद्द करून मनरेगा पूर्ववत करावी. वर्षाला २०० दिवस काम आणि ७०० रुपये दैनिक वेतनाची हमी द्यावी. संमतीशिवाय बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर तातडीने बंद करावेत.
४. बंद करण्यात आलेले ‘लाडकी बहीण’ योजनेचे अनुदान मागील थकबाकीसह तातडीने सुरू करावे.
५. मानवत तालुक्यातील गायरान जमिनीवर ज्यांचा प्रत्यक्ष ताबा आहे, त्यांच्या नावे सातबारा करावा.
६. दिव्यांग, निराधार, विधवा आणि श्रावणबाळ योजनेतील थकीत मानधन तातडीने वितरित करावे.
७. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना २०२५-२६ वर्षासाठी १७ हजार ५०० रुपये पीकविमा देण्यात यावा.
८. घरकुल योजनेचे थकीत हप्ते तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावेत.