Youth electrocuted Manvat Parbhani
मानवत : शहरातील मोंढा परिसरातील पंचशील नगर येथे 39 वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. 30) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. बालाजी महिपत बनसोडे असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून ते हमालीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास मानवत शहर व तालुक्यात अचानक वादळी वारे आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे घराच्या पत्र्यावरून पाणी गळत असल्याने ते दुरुस्त करण्यासाठी बालाजी बनसोडे हे छतावर गेले होते. यावेळी ताडपत्री टाकताना त्यांचा महावितरणच्या विद्युत तारेला स्पर्श झाला आणि त्यांना जोराचा विजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला.
मंगळवारी (ता. 31) ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर व त्यांच्या पथकाने पंचनामा केला. या घटनेनंतर महावितरणने संबंधित कुटुंबाला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नगरसेवक राजकुमार खरात यांनी केली आहे.
बालाजी बनसोडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार असून या दुर्घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.