महावितरणचा नवाकोरा डीपी चार तासांतच जळून खाक pudhari photo
परभणी

Parbhani News : महावितरणचा नवाकोरा डीपी चार तासांतच जळून खाक

ममता कॉलनीत सलग दुसऱ्या दिवशी अंधार; नागरिकांच्या 200 केव्ही डीपी मागणीकडे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

परभणी : शहरातील कारेगाव रोडवरील ममता कॉलनीत महावितरणच्या बेजबाबदार आणि ढिसाळ कारभाराने अक्षरशः कळस गाठला आहे. आधीच नादुरुस्त झालेल्या डीपीमुळे एक रात्र अंधारात काढलेल्या नागरिकांना दुसऱ्याच दिवशी बसवलेला नवाकोरा डीपी अवघ्या चार तासांत पेट घेऊन जळून खाक झाल्याने पुन्हा अंधाराची शिक्षा भोगावी लागली. या संतापजनक प्रकारामुळे महावितरणच्या कार्यपध्दतीवर तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.

ममता कॉलनी भागातील 100 केव्ही क्षमतेचा डीपी शनिवारी (दि.18) अचानक निकामी झाला आणि संपूर्ण ममता कॉलनी अंधारात बुडाली. उकाड्याच्या झळा सहन करत नागरिकांनी रात्र जागून काढली. संतप्त नागरिकांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर रविवारी (दि.19) सायंकाळी 4 वाजता महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी नवीन डीपी बसविला. मात्र हा डीपी देखील 100 केव्हीचाच असल्याने नागरिकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेल्याचे पहावयास मिळाले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, डीपी बसविल्यानंतर काही वेळातच त्यातून धूर निघू लागल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. तरीही संबंधित कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. परिणामी, वाढत्या वीजभाराचा ताण सहन न झाल्याने रात्री सुमारे 8 वाजता डीपीने भीषण आग पकडली. काही क्षणांतच तो जळून खाक झाल्याचे पहावयास मिळाले. आगीच्या भडक्यात परिसरातील झाडेसुध्दा जळाली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या घटनेमुळे ममता कॉलनी आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना पुन्हा एकदा अंधारात रात्र काढावी लागली. विशेष म्हणजे, हा 100 केव्ही डीपी परिसरातील वाढत्या वीज वापरासाठी अपुरा पडत असल्याने तो वारंवार नादुरुस्त होत असल्याची बाब नागरिकांनी यापूर्वीच अनेकदा लेखी स्वरूपात मांडली होती.

200 केव्ही क्षमतेचा डीपी बसविण्याची मागणीही वारंवार करण्यात आली होती. मात्र, महावितरणकडून या मागण्यांकडे सातत्याने कानाडोळा करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नियोजनशून्यतेने आणि हलगर्जीपणे काम केल्यामुळेच हा प्रकार घडल्याचे स्पष्ट होत असून, या निष्काळजीपणाची चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. दरम्यान, वारंवार होणाऱ्या या प्रकारांमुळे नागरिकांच्या संयमाचा बांध फुटत असून, तातडीने सक्षम क्षमतेचा डीपी बसवला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT