Bullock killed by lightning Jintur Parbhani
जिंतूर : तालुक्यातील रायखेडा शिवारात अवकाळी पावसासह झालेल्या विजेच्या कडकडाटामुळे एका शेतकऱ्याचा बैल ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि. ३१) पहाटे पाचच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून आधीच अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या दहिभाते कुटुंबावर आणखी संकट ओढवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गट क्रमांक ९२ मधील शेतकरी नानासाहेब नामदेव दहिभाते यांच्या शेतात ही घटना घडली. ३० मार्चपासून परिसरात अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती. रात्रभर विजांचा कडकडाट सुरू असतानाच पहाटे अचानक वीज कोसळून त्यांच्या बैलाचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाकडून तलाठी आर. आर. धुळे यांनी गावकऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकरी नानासाहेब दहिभाते यांनी शासनाकडे तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली असून अशा आपत्तीत बाधित शेतकऱ्यांना त्वरित दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडूनही करण्यात येत आहे.