परभणी : बुधवारी सायंकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात घडलेली घटना ही राज्यातील आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळपणाचे जिवंत उदाहरण ठरली आहे. रात्री सुमारे सातच्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडित झाला आणि त्यानंतर आयसीयू विभागात असलेली इन्व्हर्टर प्रणाली पूर्णपणे निकामी ठरली. साधारण एक तास आयसीयू, व्हेंटिलेटर रूम आणि इतर महत्त्वाच्या विभागांमध्ये पूर्ण अंधार पसरल्याचे भयावह चित्र दिसून आले.
आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण, गंभीर अवस्थेत उपचार घेत असलेले इतर रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची शारीरिक व मानसिक घालमेल प्रचंड वाढली. अंधारामुळे रुग्ण अस्वस्थ होऊ लागले, काहींच्या मशीनरीवरील आकडे अनियमित दिसू लागले, तर बाहेर उभ्या नातेवाईकांची चिंता वाढतच गेली.
“आयसीयू म्हणजे जीव वाचवण्याची जागा… तिथे तासभर अंधार असावा? इन्व्हर्टरही चालू झाला नाही? हे खूपच धक्कादायक आहे,” असे अनेक नातेवाइकांनी संताप व्यक्त करत प्रशासनावर जोरदार टीका केली.
घटनेतील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, संपूर्ण विभाग अंधारात गेल्यानंतरही रुग्णालय प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी किंवा तांत्रिक पथक जवळपास अदृश्यच होते. ना कोणती आपत्कालीन यंत्रणा सुरु करण्यात आली, ना कोणती तातडीची पर्यायी व्यवस्था उभी करण्यात आली.
अशा परिस्थतीत रुग्णांची सुरक्षितता करणे, पर्यायी पॉवर बॅकअप तपासणे आणि परिस्थितीचा तातडीने अंदाज घेणे ही प्रशासनाची जबाबदारी असते. पण प्रत्यक्षात मात्र अनेक कर्मचारी गायब असल्याचे स्पष्ट दिसले.
विशेष म्हणजे, रात्री उशिरापर्यंत या संपूर्ण घटनेवर रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली गेली नव्हती. आयसीयू सारख्या अत्यंत संवेदनशील विभागात वीजपुरवठा आणि इन्व्हर्टर यंत्रणा दोन्ही एकाच वेळी बंद पडणे ही गंभीर बाब असून त्यावर तातडीची चौकशी व्हावी अशी मागणी नातेवाईकांकडून होत आहे.
राज्यभरातील शासकीय रुग्णालयातील ढिसाळ व्यवस्था, अपुरी यंत्रसामग्री आणि दुर्लक्षिलेली देखभाल यामुळे रुग्णांना जीवावर उदार होऊन उपचार घ्यावे लागत आहेत. परभणी जिल्हा रुग्णालयातील ही घटना त्या दुर्व्यवस्थेचे आणखी एक उदाहरण ठरली आहे.