चारठाणा : जिंतूर तालुक्यातील सावरगाव येथे मानसिक छळाला कंटाळून ६२ वर्षीय महिलेने स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २०) सकाळी घडली. या प्रकरणी चारठाणा पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Pasr
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाबाई ज्ञानोबा भुतकर (वय ६२, रा. सावरगाव) यांनी गावापासून सुमारे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या गट क्रमांक ९६ मधील स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन जीवन संपविले. ही घटना सोमवारी सकाळी ०७ ते १० वाजण्याच्या दरम्यान घडल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी महादेव ज्ञानोबा भुतकर (रा. सावरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आशामती भुतकर व बुद्धभूषण भुतकर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपींनी संगनमत करून समाबाई भुतकर यांच्यावर अनैतिक संबंध असल्याचा खोटा आरोप केला. त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार अपमानित करणे, शिवीगाळ करणे तसेच "जीवे मारून टाकू" अशी धमकी देत सतत मानसिक छळ केल्यामुळे त्या नैराश्यात गेल्या व त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी चारठाणा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) विविध कलम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास साहयक पोलीस निरीक्षक बालाजी पुंड याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप वाघ करत आहेत.समाबाई भुतकर यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे सावरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.