Parbhani Charthana Farmers Issue
चारठाणा : चारठाणा व परिसरातील शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी सीएससी केंद्रांवर वारंवार चकरा मारत आहेत. मात्र, संबंधित संकेतस्थळाचा सर्व्हर डाऊन असल्याने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.
पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता शनिवारी (दि. 20 जून) शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप पूर्ण झालेली नसल्याने त्यांना पुढील हप्ता मिळणार की नाही, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
केंद्र शासनाने पीएम किसान योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना 30 जूनपूर्वी वार्षिक ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास संबंधित शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
सध्या ई-केवायसीसाठी शेतकरी सीएससी केंद्रांवर गर्दी करत आहेत. मात्र, सर्व्हर वारंवार बंद पडत असल्याने प्रक्रिया पूर्ण होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाने तातडीने सर्व्हरची समस्या दूर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.