मानवत, पुढारी वृत्तसेवा: शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यात झालेल्या सिंचन विहिरीचे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले कुशल (बांधकाम) बील देण्यात यावे, या मागणीसाठी आज (दि. २७) भारत राष्ट्र समितीच्या नेतृत्वाखाली मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंचायत समितीसमोर भजन आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. (Parbhani News)
याबाबत अधिक माहिती अशी, शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत दोन वर्षांपूर्वी तालुक्यातील अनेक गावांत शेतकऱ्यांनी सिंचन विहिरी बांधल्या. परंतु, या सिंचन विहिरीचे कुशल (बांधकाम) बील शासनाच्या लालफितीतच अडकले. सदरील बील लवकरात लवकर काढावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भारत राष्ट्र समितीच्या वतीने २० सप्टेंबरला एका निवेदनाद्वारे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिला होता. परंतु, प्रशासनाने या निवेदनाची दखल घेतली नसल्याने बीआरएसचे पाथरी विधानसभा प्रमुख प्रा. प्रकाश भोसले व तालुकाध्यक्ष हनुमान मसलकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज सकाळी ११ च्या सुमारास येथील पंचायत समितीसमोर टाळ मृदुंगाच्या गजरात दीड तास भजन आंदोलन केले. (Parbhani News)
या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेत चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. या बाबतचे लेखी पत्र देण्यात आले आहे. या आंदोलनात लिंबाजी कचरे, विलास काळे, श्याम कबले, सीताराम काळे, गणेश भारती, बंडू बेंडकर आदीसह शेतकरी सहभागी झाले होते.
हेही वाचा