सोनपेठ ः राज्यात आता यांत्रिकी पध्दतीने सेप्टिक टँक व मलजल वाहिन्यांची स्वच्छता करण्याचा निर्णय शासनाने घेतला. यासाठी तीन महिन्यांत यंत्रांची खरेदी करावी, अशा सूचना पालिकांना देण्यात आल्या. स्वच्छ भारत अभियान किंवा वित्त आयोग निधीतून पालिकांतून यंत्रांची खरेदी करावी अशी सूचना देण्यात आली. या सुचनेनुसार नगरपरिषदेने गुरुवारी (दि.19) नवीन वर्षानिमित्त शहरासाठी घेतलेल्या नवीन यंत्राचे उद्घाटन नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
केंद्र शासनाने 6 डिसेंबर 2013 पासून हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सेप्टिक टँक व मलजल वाहिन्यांची स्वच्छता यांत्रिक उपकरणाद्वारे करावी. याबाबतचे काम करणाऱ्या सफाई कामगारांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देत त्यांचा मैला हाताळणीशी संबंध येणार नाही याबाबत सूचना दिल्या.
राज्यातील 368 स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सेप्टिक टँक, मलजल वाहिन्यांची संपूर्ण यांत्रिकी पध्दतीने स्वच्छता करावी. त्यासाठी यंत्र खरेदीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेला सूचना दिल्या होत्या. तीन महिन्यांच्या कालावधीत यंत्रांची खरेदी करावी. तीन महिन्यांनंतर सेप्टिक टँक, ड्रेनेजची स्वच्छता केवळ यांत्रिकी पध्दतीने करण्यात येईल, याची दक्षता घ्यावी, असेही सूचनापत्रात म्हटले. यामुळे सफाई कामगारांना सोयीचे होइल व जिवाला धोका होणार नाही.
काही वर्षापूर्वी तालुक्यातील भाऊचा तांडा येथे सेफ्टी टँकचा हाताने उपसा करतात, येथील पाच कामगार टँकमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला होता. कामगारांच्या सुरक्षिततेच्या अनुशंगाने हे यांत्रिकी करण महत्त्वाचे आहे. शासनाच्या सुचनेचे पालन करत नगर परिषदेत यंत्र घेण्यात आले. सोनपेठच्या वाढत्या विस्तारानुसार सांडपाणी व्यवस्थापनाची कामे वेळेत पूर्ण व्हावीत आणि नागरिकांना दुर्गंधी व साचलेल्या सांडपाण्यापासून दिलासा मिळावा, या उद्देशाने हे यंत्र कार्यान्वित करण्यात आली.
या यंत्राच्या माध्यमातून शहरातील गटारी मोकळ्या करून नेहमी वाहत्या ठेवणे, सांडपाणी पाईपलाईनमधील अडथळे दूर करणे तसेच मलजल उपसा करण्याचे काम अधिक जलद आणि प्रभावी पध्दतीने पूर्ण करता येणार आहे. या सुविधेमुळे नगर परिषदेचे स्वच्छतेचे व्यवस्थापन बळकट होऊन शहर स्वच्छ ठेवण्यास प्रशासनाला मोठी मदत होणार आहे.
नवीन वर्षाचे औचित्य साधत नवीन यंत्राचे उद्घाटन नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक बळीराम पवार, अक्षय कदम, सद्दाम हुसेन, शुभम कदम, अब्दुल रहेमान, नाना झिरपे, साजेद कुरेशी, संतोष अंबुरे, महालिंग मेहत्रे, पत्रकार किरण स्वामी, राधेश्याम वर्मा, कर्मचारी उपस्थित होते.