Mumbai-Nanded Express robbery  Pudhari
परभणी

Railway Theft Parbhani | रेल्वेत प्रवासी दाम्पत्याची लूट : मुंबई–नांदेड एक्स्प्रेसमधील धक्कादायक घटना

मुंबई–नांदेड धावणाऱ्या राजाराणी एक्स्प्रेसमधील चोरीच्या घटनेचा लोहमार्ग पोलिसांना छडा लावता आलेला नाही

पुढारी वृत्तसेवा

Mumbai-Nanded Express robbery

पूर्णा : मुंबई–नांदेड धावणाऱ्या राजाराणी एक्स्प्रेसमधील वातानुकूलित डब्यात चोरीची घटना घडूनही रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि लोहमार्ग पोलिसांना चोरट्यांचा सुगावा लागलेला नाही. ए.सी. कोचमधील प्रवाशाची सुमारे ७० हजार रुपयांची लूट झाली असून, पूर्णा रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेचा फोलपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे.

मुंबई (CSMT) येथून नांदेडकडे प्रवास करणारे अरुण गणेशराव हट्टेकर (वय ४२, रा. सफाळे, ता. जि. पालघर) हे पत्नीसमवेत राजाराणी एक्स्प्रेसच्या बी/३ कोचमधील बर्थ क्रमांक ३३ व ३४ वरून प्रवास करत होते. शनिवारी पहाटे सुमारे ५ ते ५.३० वाजण्याच्या दरम्यान, परभणी स्थानक सोडत असताना अज्ञात चोरट्यांनी झोपेत असलेल्या प्रवाशांची ब्राऊन रंगाची लेदर बॅग लंपास केली.

ही बाब गाडी पूर्णा रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर आल्यानंतर लक्षात आली. चोरीस गेलेल्या बॅगेत सुमारे ५० हजार रुपये किमतीचा आयफोन, २० हजार रुपये रोख, एटीएम कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड तसेच अन्य महत्त्वाची कागदपत्रे होती. चोरटे पूर्णा स्थानकावरच डब्यातून उतरले असावेत, असा संशय प्रवाशांनी व्यक्त केला आहे.

रेल्वे प्रशासनाकडून पूर्णा स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे, नियमित गस्त आणि सुरक्षा कर्मचारी असल्याचा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात ए.सी. डब्यात चोरी होऊनही कोणालाही संशय येत नाही, ही बाब सुरक्षा यंत्रणेच्या हलगर्जीपणाचे जिवंत उदाहरण ठरत आहे.

या प्रकरणी नांदेड लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०२१/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (सी) अंतर्गत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.

दरम्यान, “ए.सी. कोच सुरक्षित असतो” हा प्रवाशांचा समज चुकीचा ठरत असून, झोपेत असलेल्या प्रवाशांना लुटून चोरटे सहज पसार होत आहेत. रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिस केवळ गुन्हा नोंदवण्यापुरतेच मर्यादित राहत असल्याची तीव्र नाराजी प्रवाशांतून व्यक्त होत आहे.

पूर्णा रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या गाड्यांची संख्या आणि प्लॅटफॉर्मवरील अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सुरक्षा रक्षकांच्या निष्काळजीपणामुळे हे स्थानक चोरट्यांसाठी सुरक्षित ठिकाण बनत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सीसीटीव्ही फुटेज, गस्तीतील त्रुटी आणि जबाबदार अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी होणार की प्रकरण पुन्हा थंड बस्त्यात जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT