मानवत; पुढारी वृत्तसेवा : मानवतला गणपती विसर्जन मिरवणूक गुरुवारी (दि. २८) उत्साही वातावरणात व शांततेत पार पडली. विसर्जन मिरवणूक तब्बल ८ तास सुरू होती. मिरवणुकीत एकूण ३४ मंडळाचा समावेश होता.
गणेशोत्सवाच्या नऊ दिवसानंतर गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. शहरातील मुख्य रस्त्याने व गणपती विसर्जन मार्गे ढोल पथकाच्या गजरात, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली. काही मंडळांनी देखावे केले होते. मिरवणुकीदरम्यान मुख्य रस्त्यासह संभाजीनगर भागात अनेक मित्र मंडळाच्या वतीने महाप्रसादासह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मध्यरात्री १ वाजेपर्यंत मिरवणूक सुरू होती. मिरवणुकीत काही गणेश मंडळांच्या वतीने वाजविण्यात येणाऱ्या सिंगर बँडला पोलीस प्रशासनाच्या वतीने आक्षेप घेण्यात आल्याने काही वेळ तणाव पसरला होता. मिरवणुकीदरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक रागसुधा आर यांनी भेट देऊन आढावा घेतला. पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
हेही वाचा :