परभणी : जिंतूर तालुक्यातील बोरी येथे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारक उभारणीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले. या प्रकरणात 46 शिवभक्त तरुणांवर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याने विविध मराठा व सामाजिक संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत निषेध नोंदवला आहे.
स्मारक उभारणीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादानंतर पोलिसांनी संबंधित तरुणांवर गुन्हे नोंद केले. मात्र, हे गुन्हे खोटे व अन्यायकारक असल्याचा आरोप करत सर्व मराठा संघटनांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. निष्पाप महिला व पुरुषांना गुन्ह्यात अडकवून त्यांच्यावर कारवाई केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, येत्या काही दिवसांत विवाह असलेल्या एका तरुणालाही या कारवाईत अटक करण्यात आल्याने कुटुंबीयांमध्ये तीव नाराजी व्यक्त होत आहे. महिलांसोबत गैरवर्तन झाल्याच्या तक्रारी समोर आल्याने प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे. संबंधित पोलिसांवर तत्काळ गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्याची मागणी संघटनांनी केली आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा आरोप असलेल्या बीट जमादार दिलावर याच्यावर तत्काळ बडतर्फी व फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
प्रशासनाने सर्व खोटे एफआयआर रद्द करून अटकेत असलेल्या तरुणांची तत्काळ सुटका करावी, तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित ठिकाणी छत्रपतींचा पुतळा अधिकृत बसविण्यास सहकार्य करावे, अशी मागणी पुढे करण्यात आली आहे.
निवेदनावर मराठा क्रांती मोर्चाचे बालाजी मोहिते, संभाजी बिगेड जिल्हाध्यक्ष गजानन जोगदंड, मराठा आरक्षण समिती अध्यक्ष सुभाष जावळे, संभाजी सेना जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर, मराठा सेवा मंडळ संस्थापक अध्यक्ष नितीन देशमुख, संभाजी सेना प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, शिवमुद्रा संघटना संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत मोगल पाटील, संभाजी सेना शहराध्यक्ष अरुण पवार, शिव छत्रपती निष्ठा प्रतिष्ठान अध्यक्ष संदीप गव्हाणे, शिवमुद्रा संघटना सोनपेठचे ॲड. निवृत्ती कदम, संभाजी बिगेड शहराध्यक्ष गजानन लव्हाळे, ज्ञानेश्वर खटिंग, सचिन वाघ, मराठा सेवा मंडळ जिल्हाध्यक्ष गोविंद इक्कर पाटील यांच्या स्वाक्षरी आहेत.
आंदोलनाचा इशारा
प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनांनी दिला आहे. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले. या प्रकरणामुळे बोरी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.