Godavari River 
परभणी

Godavari River | गोदावरी नदीच्या पात्रात वसलेले जाभुळबेट नामशेष होण्याच्या मार्गावर

Godavari River | मराठवाड्यासाठी भूषणावह असलेले आणि निसर्गरम्यता, जैवविविधता व धार्मिक महत्त्वामुळे प्रसिद्ध असलेले जांभुळबेट सध्या मोठ्या संकटात सापडले आहे.

पुढारी वृत्तसेवा

मदन आंबोरे ताडकळस

परभणी: मराठवाड्यासाठी भूषणावह असलेले आणि निसर्गरम्यता, जैवविविधता व धार्मिक महत्त्वामुळे प्रसिद्ध असलेले जांभुळबेट सध्या मोठ्या संकटात सापडले आहे. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला आलेल्या महापुराने या बेटाचे मोठे नुकसान केले आहे.

नाथसागरातून आणि इतर धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरीत झाल्यामुळे नदीने धोक्याची पातळी ओलांडली. याचा थेट फटका पूर्णा आणि पालम या दोन तालुक्यांच्या सीमेवर, ताडकळसपासून अवघ्या १० कि.मी. अंतरावर गोदावरीच्या मध्यभागी वसलेल्या या नयनरम्य बेटाला बसला आहे.

या महापुरामुळे जांभुळबेटाची मोठ्या प्रमाणावर माती खरडून गेली असून बेटाचा मोठा भूभाग खचला आहे. कधीकाळी सुमारे ३० एकर क्षेत्रफळावर पसरलेले हे बेट आता केवळ २० एकरच्या जवळपास उरले आहे. पुराच्या पाण्याने बेटाची सुपीक माती वाहून नेल्यामुळे येथील अनेक मोठी झाडे नष्ट झाली आहेत आणि बेटावरील मूलभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे.

संवर्धन समितीचा वसा, राजकीय दुर्लक्षामुळे निराशा

जांभुळबेट हे पुरातन मारुती मंदिर, दुर्मिळ औषधी वनस्पती, फळझाडे आणि विविध पक्ष्यांचे आश्रयस्थान यामुळे पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरले होते. याचमुळे, गेल्या पाच वर्षांपासून कृषी भूषण कांतराव झरीकर यांच्या प्रेरणेने शेकडो तरुणांनी संवर्धन समितीच्या माध्यमातून या बेटाचे जतन करण्याचा वसा घेतला होता. या निसर्गरम्य स्थळाचे सौंदर्य आणि जैवविविधता टिकवण्यासाठी स्थानिक तरुण मेहनत घेत असताना, शासकीय अधिकारी व राजकीय नेत्यांकडून मात्र या बेटाकडे सतत दुर्लक्ष होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे.

स्थानिक नागरिक, निसर्गप्रेमी आणि संवर्धन समितीतील सदस्यांनी महाराष्ट्र राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे, जेणेकरून बेटाच्या विकासासाठी आणि संवर्धनासाठी मोठा निधी उपलब्ध होईल. मात्र, राजकीय पुढारी केवळ आश्वासने देत असल्याचे चित्र आहे. "बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी" या म्हणीप्रमाणे दिलेली आश्वासने हवेत विरल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.

स्थानिकांमध्ये प्रशासनावर तीव्र नाराजी

जांभुळबेटाच्या आजूबाजूला असलेल्या फळा, गोळेगाव, आरखेड, मुंबर, देऊळगाव दु, तसेच तीर्थक्षेत्र मोतीराम महाराज संस्थान येथील स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर तीव्र नाराजी आहे. त्यांचे स्पष्ट मत आहे की, जर शासनाने वेळेत संवर्धनाचे उपाय केले असते, तर आज बेटाची इतकी दुरवस्था झाली नसती.

स्थानिक नागरिक आणि निसर्गप्रेमी यांचा रोष आहे की, इतरत्र 'विकास'कामाच्या नावाखाली जिथे गरज नाही, अशा ठिकाणी कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. याउलट, निसर्गाचा अनमोल ठेवा असलेल्या जांभुळबेटाच्या संवर्धनासाठी कोणीच पुढाकार घेत नाही. केवळ पोकळ घोषणा आणि आश्वासने मिळतात.

महाराष्ट्राचा ठेवा धोक्यात

गोदावरी नदीच्या प्रवाहात आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे जांभुळबेटाची जैवविविधता धोक्यात आली आहे. स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेली भीती अत्यंत गंभीर आहे: जर सध्याची परिस्थिती अशीच राहिली, तर पुढील काही वर्षांत हे निसर्गरम्य पर्यटन स्थळ केवळ इतिहासाचा भाग बनून जाईल.

जांभुळबेट हे केवळ पूर्णा किंवा पालम तालुक्याचे नव्हे, तर परभणी जिल्ह्यातील पर्यटनप्रेमींचा आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या निसर्गरम्य पर्यटनाचा एक अनमोल ठेवा आहे. आता परभणी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देणार का, असा यक्षप्रश्न स्थानिक नागरिक आणि निसर्गप्रेमी विचारत आहेत. या बेटाचे तातडीने संवर्धन करणे, नदीपात्रातील वाळू उपसा थांबवणे आणि संरक्षक भिंती बांधणे गरजेचे आहे, अन्यथा एक सुंदर नैसर्गिक वारसा आपण कायमचा गमावून बसू.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT