गंगाखेड : तालुक्यातील गंगाखेड-परळी महामार्गावरील रखडलेल्या व अपूर्ण कामामुळे पुन्हा एकदा निष्पापांचे बळी गेले. सोनपेठ तालुक्यातील निळा पाटी परिसरात पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी वळण रस्त्याची योग्य सूचना नसल्याने कारचा भीषण अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.14) रात्री घडली.
परळीहून गंगाखेडकडे येत असताना एमएच 44, एस 6285 ही कार निळा पाटीजवळ आली होती. यावेळी तेथील पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत असून रात्रीला कोणतीही दिशा दर्शविणारी सूचना, फलक अथवा प्रकाश व्यवस्था नसल्याने चालकाला वळण रस्ता लक्षात आला नाही. अचानक ब्रेक मारल्याने कारवरील त्याचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या बाजूला असलेल्या मुरम ढिगाऱ्यावर कार आदळली. या अपघातात चालक गणेश जगन्नाथ दुलेवाड (वय 40, व्यवसाय - शिक्षक, रा.दाबी तांडा ता.परळी; मूळ रा.बहादरपुरा ता.कंधार जि.नांदेड) यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात कारची स्टेअरिंग छातीतील बरगड्यांत घुसल्याने मृत्यू झाल्याचे समजते. कारमध्ये समवेत असलेले राज राम ईश्वर (वय 28, रा.अभवरवास,ता.जि.कुशीनगर, उत्तर प्रदेश) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णवाहिका चालक हनुमान इंगळे व रावण भालेराव यांनी त्यांना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गेल्या 5 वर्षांपासून रखडलेल्या गंगाखेड-परळी महामार्ग कामामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप वाहनधारकांतून होत आहे.
अवघ्या 30 किमीच्या या रस्त्यावर ठिकठिकाणी पुलांची कामे अपूर्ण असून अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आला. कोणतीही सुरक्षितता व्यवस्था नसल्याने सतत अपघात घडत आहेत. अपघातांची मालिका सुरू असतानाही महामार्ग प्रशासनाची गंभीर उदासीनता दिसून येत आहे. धोकादायक ठिकाणी तात्काळ सूचना फलक, प्रकाश व्यवस्था व पर्यायी मार्गाची स्पष्ट चिन्हे लावावीत तसेच रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांतून होत आहे.