परभणी

Parbhani farmers fraud : पूर्णा तालुक्यात शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक; शेतमाल घेऊन व्यापारी कुटुंबासह फरार

या प्रकारात सुमारे १०० ते १५० शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे

पुढारी वृत्तसेवा

एरंडेश्वर : पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून तब्बल साडेपाच कोटी रुपयांचा शेतमाल घेऊन व्यापारी कुटुंबासह फरार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारात सुमारे १०० ते १५० शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला असून, संतप्त शेतकऱ्यांनी पूर्णा पोलीस ठाण्यात सामूहिक तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एरंडेश्वर येथील शेख हमीद शेख सरू बालेसाब आणि शेख सरू शेख बालेसाब हे गेल्या काही वर्षांपासून शेतमाल खरेदीचा व्यवसाय करत होते. सुरुवातीला त्यांनी शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर हळद, सोयाबीन, हरभरा, गहू आणि तूर या पिकांची खरेदी करण्यात आली. मात्र, शेतमाल उचलल्यानंतर "बाजारात तेजी-मंदी सुरू आहे", "काही दिवसांत पैसे देतो" अशी विविध कारणे सांगून देयके देण्यास टाळाटाळ करण्यात आली. अखेर संबंधित व्यापारी आपल्या मुलांसह अचानक फरार झाल्याने शेतकऱ्यांना फसवणुकीचा संशय आला.

या प्रकरणात सुमारे १,०१६ क्विंटल हळद, ३,६३० क्विंटल सोयाबीन, २,००० क्विंटल हरभरा, ५७ क्विंटल गहू आणि ३५ क्विंटल तूर असा एकूण सुमारे ६,८०० क्विंटल शेतमाल, अंदाजे साडेपाच कोटी रुपयांच्या किमतीचा, व्यापाऱ्यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बाधित शेतकरी एकत्र येऊन पूर्णा पोलीस ठाण्यात गेले. प्रभारी ठाणेदार तथा सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी सिंगणवाड यांच्याकडे सामूहिक तक्रार दाखल करण्यात आली असून, या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, आरोपी व्यापाऱ्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करावी तसेच शेतकऱ्यांची थकीत रक्कम वसूल करून द्यावी, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT