A second chance for undeserving ladki bahin
नरहरी चौधरी
परभणी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडल्या गेल्यामुळे ३८ हजाराहून अधिक महिलांचा लाभ सद्यस्थितीला बंद झालेला आहे. अशा पात्र लाभार्थी महिलांना दिलासा देत शासनाने ई-केवायसीमध्ये सुधारणा करण्याची अंतिम संधी ३१ मार्चपर्यंत उपलब्ध करून दिली. यामुळे संबंधित लाभापासून वंचित राहत असलेल्या महिलांना ही दुसरी संधी उपलब्ध झाल्याचे बोलले जात आहे.
लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांचे ई-केवायसीद्वारे ३१ डिसेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्यात आले होते. मात्र ही प्रक्रिया राबविताना अनेक महिलांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्य शासकीय विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत नियमित, कायम अथवा कंत्राटी स्वरूपात कार्यरत आहेत का, किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत का, यासंबंधी पर्याय निवडताना चुकून चुकीचा पर्याय निवडल्याचे निदर्शनास आले.
या चुकीमुळे योजनेंतील निकषांनुसार अनेक लाभार्थी महिला अपात्र ठरल्या. या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांच्या पात्रता व अपात्रतेची सखोल प्रत्यक्ष पडताळणी करण्याबाबत शासनस्तरावरून २० जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले होते. दरम्यान, लाभार्थ्यांची जलद व सुलभपडताळणी व्हावी, तसेच चुकून चुकीचा पर्याय निवडलेल्या महिलांना न्याय मिळावा, यासाठी ई-केवायसीमध्ये सुधारणा करण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी लाभार्थी महिला तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने ऑनलाईन ई-केवायसीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
सदरील संधी केवळ अशा महिलांसाठी आहे, ज्यांनी नजरचुकीने कुटुंबातील सदस्य शासकीय सेवेत असल्याचा किंवा निवृत्तीवेतनधारक असल्याचा चुकीचा पर्याय निवडला होता. अशा लाभार्थी महिलांना ३१ मार्चपर्यंत ई-केवायसी दुरुस्ती करता येणार आहे. ई-केवायसीपूर्वी जिल्ह्यात ४ लाख ५८ हजार महिला लाभासाठी पात्र होत्या. मात्र ई-केवायसी दरम्यान चुकीचे पर्याय निवडल्यामुळे तब्बल ३८ हजार ५७ महिला लाभापासून वंचित राहिल्या होत्या. आता पुन्हा एकदा दुरुस्तीची संधी उपलब्ध झाल्याने या महिलांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
अनेक प्रकारच्या त्रुटीने ठरल्या अपात्र
परभणी जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी जून व जुलै महिन्यात एकूण २ लाख ५७ हजार ६८९ महिलांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २ लाख ४१ हजार ३७२ महिला पात्र ठरल्या. तर तपासणीत १७ हजार ५२९ महिला अपात्र ठरल्या. तसेच ऑगस्ट महिन्यात २ लाख १३ हजार ५६७ महिलांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी २ लाख २ हजार ९१४ महिला पात्र ठरल्या तर तपासणीत २ हजार ७६४ महिला अपात्र ठरल्या.
एवढेच नव्हे तर नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या २२ हजार ७३९ महिलांचा समावेश असून त्या नमो योजनेतून १ हजार रूपये लाभ घेत असल्याने त्यांना या योजनेतून केवळ ५०० रुपये मिळत आहेत. पेन्शनसह कागदपत्रे नसणे, त्रुटीची पूर्तता न केलेल्या १८ हजार महिला अपात्र करण्यात आहेत. याबरोबरच कुटुंबात विवाहित एकाच मुलीच पात्र करण्यात येते अशा कुटुंबातून जास्तीच्या मुली असल्याने त्या २२७० मुली अपात्र झाल्या.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्यात आली असून, यापुढे कोणत्याही परिस्थितीत ई-केवायसी दुरुस्तीची संधी दिली जाणार नाही. त्यामुळे संबंधित महिलांनी दिलेल्या मुदतीत तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी केले आहे.