3 killed in two-car collision on Parbhani-Vasmat road
परभणी : पुढारी वृत्तसेवा
परभणी-वसमत महामार्गावरील राहाटी पाटीजवळ शुक्रवारी (दि. ५) मध्यरात्री दोन कारचा समोरासमोर भीषण अपघात झाला. हा अपघात इतका जबरदस्त होता की, दोन्ही वाहनांचा चक्काचूर होऊन तीन जण जागीच ठार झाले, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे वसमत तालुक्यातील आरळ आणि परभणी तालुक्यातील पिंगळी गावावर शोककळा पसरली आहे.
बाबाराव दत्तराव साखरे (रा. आरळ, ता. वसमत), कांताबाई अंबादास कातोरे (रा. आरळ) आणि विमलबाई बालासाहेब जाधव (रा. पिंगळी, ता. परभणी) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.
शुक्रवारी मध्यरात्री बाबाराव साखरे हे त्यांच्या कारने (क्रमांक एमएच ३८ एडी ३५४१) आरळ गावातून परभणीकडे येत होते. याच वेळी समोरून येणाऱ्या कारच्या (क्रमांक एमएच २२ बीसी ७८८८) चालकाने आपले वाहन निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात चालवत साखरे यांच्या कारला जोरदार धडक दिली.
धडक बसताच मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वाहनांचे पत्रे आणि दरवाजे दबल्याने जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांना मोठे कष्ट घ्यावे लागले. जखमींना तातडीने परभणीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.