

Purna Sugarcane farming news
पूर्णा : तालुक्यातील बरबडी गावच्या शिवारात शॉटसर्किटमुळे आग लागून अडीच एकर उभा ऊस जळाला. या आगीमुळे तीन शेतकऱ्यांचे मिळून साडेचार लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
पूर्णा तालुक्यातील बरबडी शिवारातील गट क्रमांक ७ मध्ये शेतकरी सुभाष भिमराव शिंदे, भागवत लक्ष्मण शिंदे आणि बालाजी शिंदे यांची शेती आहे. या शेतकऱ्यांनी २ एकर ऊस तोडणीसाठी उभा केला होता. महावितरणच्या विद्युत तारेत अचानक शॉटसर्किट होऊन आग लागली. आग इतकी प्रचंड पसरली की, पाहता पाहता सर्व ऊस जळून खाक झाला. आगीने तीव्र रूप घेतल्यामुळे आग विझवण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. शेतकऱ्यांना तसेच गावकऱ्यांना आग विझवण्यासाठी धावपळ केली, पण आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही.
या दुर्घटनेत संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे ४ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. मात्र, शेतकरी सुभाष भिमराव शिंदे यांनी तात्काळ एक उपाययोजना केली. त्यांनी ट्रॅक्टर रोटर फिरवून ऊस फडाच्या एक बाजूने दोन स-या मोकळ्या केल्या, ज्यामुळे जळत्या ऊसाच्या फडाला लागून असलेला शेतकरी गिरधारी शिंदे यांचा सुमारे १.५ एकर ऊस जळण्यापासून वाचला.
यासोबतच, महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना शॉटसर्किटमुळे सतत नुकसान सहन करावे लागते. तालुक्यातील विविध शिवारात यापूर्वीही अनेक वेळा विद्युत तारेत शॉटसर्किट होऊन ऊस जळाल्याच्या घटना घडल्या आहेत. तरीही लोंबकळलेली तारे, जर्जर विद्युत वाहक तारा आणि वाकलेले खांब याची दुरुस्ती केली गेलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो आणि ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनते.
संबंधित शेतकऱ्यांनी तात्काळ सरकारी अधिकाऱ्यांकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. त्यांच्या नुकसानभरपाईसाठी संबंधित विभागाने लवकरात लवकर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.