नांदेड : जून महिना अर्धा संपला तरी मृगधारा बरसलेल्या नाहीत; परंतु विष्णुपुरी प्रकल्पात अजूनही ४२ टक्के साठा आहे. गतवर्षी याच दिवसात केवळ २० टक्के जलसाठा शिल्लक होता. दरम्यान, आहे तो साठा जपून वापरण्याचे आणि सिंचनाचे आवर्तन थांबवण्याचे आदेश शासनाने नुकतेच जारी केले आहेत; या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पाणीटंचाई वाढत चालली असून सध्या १४ टँकरद्वारे ४ गावे १५ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी ९३ विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. याशिवाय अन्य ३३१ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.
नांदेड जिल्हयाचा पावसाचा इतिहास पाहता, खऱ्या अर्थाने पावसाला जुलैच्या मध्यात सुरुवात होते. गतवर्षी तर १५ जुलैपर्यंत २३.५४ टक्के पाऊस झाला होता; परंतु दरवर्षी वळीव तसेच रोहीणी नक्षत्राच्या पाऊसधारांनी तापमान घसरते. यंदा मात्र अर्ध्या जूननंतरसुद्धा तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर आहे, त्यामुळे तहान भागवण्यासाठी तसेच बाष्पीभवनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी खर्च होत आहे.
गतवर्षी सरासरीपेक्षा खूप अधिक पाऊस झाला होता. शिवाय तो नोव्हेंबरपर्यंत लांबला. पावसाचे हे प्रमाण राज्यभर होते. त्यामुळे मोठ्या धरणांसह सर्व छोटे-मोठे जलाशयं पूर्ण भरले होते. त्यामुळे अजूनही पुरेसा जलसाठा उपलब्ध आहे. गोदावरी खोऱ्यात फक्त सिद्धेश्वर प्रकल्प कोरडा पडला आहे.
विष्णुपुरी प्रकल्पात ३४.६३० दलघमी अर्थात ४२.८४ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी मे अखेर २० तर ३० जुलै रोजी २३.२२ टक्के साठा होता. या तुलनेवरून यंदा परिस्थती खूप समाधानकारक आहे. जायकवाडीत ६२२ दलघमी, माजलगावमध्ये ६८, येलदरीमध्ये ४३५ दलघमी अर्थात ५३.८२ टक्के, लोअर दुधना मध्ये १७ दलघमी, लिंबोटीत ७५ तर बारुळमध्ये १३८ दलघमी साठा आहे.
ईसापूर धरणात ९६४ दलघमी अर्थात ४२.७३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान, विष्णुपुरी प्रकल्याच्या वरील भागात दिग्रस बंधाऱ्यात २५ टक्के, मुळी बंधाऱ्यात ७८.७८, मुदगलमध्ये २८.४३, ढालेगाव बंधाऱ्यात १५.२१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. तर विष्णुपुरीच्या खाली आमदुरा बंधाऱ्यात ३९.९६ टक्के, बळेगावमध्ये ५२.८४ टक्के आणि बाभळीत १० टक्के जलसाठा शिल्लक आहे.
पाण्याची काटकसर आवश्यक
यावर्षी पावसाच्या प्रवासात 'एल निनो'चा अडथळा आहे. त्यामुळे उपलब्ध साठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवावा व सिंचनासाठीची आवर्तने थांबवावीत, असे आदेश जलसंपदा विभागाने जारी केले आहेत. या या पार्श्वभूमीवर महानगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थानी सुद्धा पाण्याची काटकसर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत..