नंदकुमार कांबळे - सिंदगीकर
नांदेड ः विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण जलाशयातील लिफ्ट इरिगेशन सिस्टम पाईपलाईनला जागोजागी गळती लागली आहे. झरी गावाजवळील कॅनलमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाईपलाईनमध्ये सुरुवातीपासुन मोठ मोठे 20 लिकेज झाल्यामुळे दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. परिणामी नांदेड शहराला उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. याकडे पाटबंधारे विभागाचे मोठे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
विष्णुपुरी जलाशयातून नांदेडशहरासह औद्योगिक वसाहती आणि शेतीला पाणीपुरवठा होत आहे. पण या प्रकल्पाच्या पाईपलाईनला झरी, पांगरीपर्यंतच्या दोन ते तीन किलोमीटर अंतरात सुमारे 20 ठिकाणी गळती लागली आहे. कुठे लहान तर कुठे मोठे छिद्रे पडल्याने पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जात आहे. त्यामुळे शेतील वेळेवर व पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. त्याचा परिणाम शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील दोन-तीन वर्षांपासून ठेकेदारांकडून योग्यरीत्या दुरुस्ती अथवा देखभाल झाली नसल्यामुळे पाईपलाईनच्या आजूबाजूला मध्यभागी मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली आहेत. त्यामुळे लिकेज समस्या सोडविण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे या निष्काळपणाला दोषी असणाऱ्या कंत्राटदार तसेच जलसंपदा विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी, तसेच जलाशयातील पाणीसाठ्याचा योग्य वापर करावा, अशी मागणी नवीन नांदेडमधील सामाजिक कार्यकर्ते ॲड. प्रसेनजित वाघमारे यांनी यांत्रिकी नाशिक विभागाचे मुख्य अभियंत्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाच्या प्रती प्रधान सचिव, जलसंपदा विभाग, मुख्य अभियंता तथा सह सचिव दक्षता पथक जलसंपदा विभाग मंत्रालय मुंबई. आणि जिल्हाधिकारी नांदेड यांना पाठवल्या आहेत.
तर आंदोलन उभारावे लागेल - विष्णुपुरी जलाशय नांदेड शहरासह शेती व उद्योगांसाठी वरदान आहे. पण या प्रकल्पाच्या पाईपलाईनला गळती लागल्याने पाण्याची नासाडी होत आहे. त्यामुळे या पाईपलाईची दुरुस्ती करण्याची गरज आहे. पण यात दिरंगाई झाल्यास आपण लवकरच जनआंदोलन उभारणार आहोत.ॲड. प्रसेनजित वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते