Two killed, five injured after being struck by lightning.
किनवट/उमरखेड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील चिखली येथे मंगळवारी (दि.२३) दुपारी झालेल्या वीज कोसळून १५ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेले अन्य तीन अल्पवयीन मुले गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तर उमरखेड तालुक्यातील कुरळी ग्रामपंचायत हद्दीतील भोजुनगर (तांडा) शेतशिवारात सोमवारी (दि.२२) दुपारी झालेल्या वादळी पावसादरम्यान विजेचा तडाखा बसून एका २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्याचे वडील किरकोळ जखमी झाले आहेत. अन्य एकाची प्रकृती चिंताजनक आहे. शेख राशीद (१५), महेश गणेश आडे (२३) अशी मृतांची नावे आहेत.
शेख राशीद (१५) हा मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास आपल्या तीन मित्रांसह घराच्या छतावर मोबाईलद्वारे सेल्फी काढत असताना अचानक जोरदार पावसासह विजांचा कडकडाट सुरू झाला. आणि त्याचवेळी अचानक वीज त्याच्या अंगावर कोसळल्याने शेख राशीद याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्याच्यासोबत असलेले तिन्ही मित्र गंभीर जखमी झाले.
त्यापैकी सख्खे भाऊ असलेले आबीद शेख फिरोज (१५) व आकीब शेख फिरोज (१३) या दोघांना गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून प्रथमोपचार करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने, पुढील उपचारासाठी त्यांना तेलंगणातील आदिलाबाद येथे हलविण्यात आले आहे. तर शेख सयान शेख बाबू याच्यावर किनवट शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
तर अन्य एका घटनेत भोजुनगर तांडा येथील महेश गणेश आडे (२३), त्यांचे वडील गणेश फकिरा आडे (५५) तसेच काळु कनिराम पवार (वय ७०) हे तिघेही अमडापूर धरणालगतच्या शेतशिवारात जनावरे चारण्यासाठी गेले होते.
दुपारी सुमारे २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान वीज कोसळून तिघेही तिच्या तडाख्यात सापडले. तिघांनाही फुलसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर महेश आडे यांना मृत घोषित करुण शवविच्छेदनासाठी सवना येथे पाठविले तसेच गंभीर जखमी झालेल्या काळुराम पवार यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.