This year, 'Vishnupuri' Project was filled only once
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : ऑगस्ट महिना संपला असून दमदार पावसाची बहुतेक नक्षत्रे संपली आहेत. तरी देखील वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ जेमतेम ६० टक्के पाऊस झाला. परिणामी अत्यल्प केवळ सुमारे २ टीएमसी क्षमतेचे विष्णुपुरी सारखा अगदी छोटा प्रकल्प देखील केवळ एकदाच भरला. त्यातून फक्त १३ दलघमी पाण्याचा विसर्ग झाला, तर जायकवाडी या मोठ्या धरणात २० टक्क्याच्या वर जलसाठा असला तरी त्यातून अद्याप १६३ दलघमी पाण्याचा विसर्ग झाला आहे. गतवर्षी या दिवसात महाराष्ट्रातील सर्व धरणे गच्च भरुन वाहू लागली होती.
मागील आठवड्यात बहुतेक दिवस ढगाळ वातावरण होते. त्यामुळे वातावरणातील आर्द्रता कमी होऊन उकाडा वाढला होता. काही भागात किरकोळ पाऊस पडला देखील. परंतु जोरदार पाऊस किंवा संततधार यंदा पहायला मिळाली नाही. त्यामुळे ऑगस्ट अखेर जिल्ह्यात केवळ ५८.०२ टक्के पाऊस पडला, कमी पाऊस आणि उकाडा यामुळे पिकांची परिस्थिती चिंताजनक बनली असून जेमतेम पाण्यावर पिके तगली असली तरी उत्पादनावर मात्र गंभीर परिणाम होण्याची भीती जाणकार शेतकरी व्यक्त करीत आहेत. रविवारी देखील दुपारपासून ढगाळ वातावरण होते. काही भागात पाऊस पडला देखील, परंतु पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा एवढा पाऊस अद्याप पडलेला नाही.
गतवर्षी दि. २७ व २८ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु होता. त्यामुळे गोदावरी नदीने देखील पात्र सोडले होते. सिद्धेश्वर, येलदरी, विष्णुपुरी, अपर मानार, लोअर मानार यासारख्या मोठ्या जलाशर्यातून सतत विसर्ग सुरु होता. माजलगाव वगळता सर्व धरणं व छोट्या-मोठ्या जलाशयांतून पाणी सोडले जात होते. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती होती. गोदावरी, पैनगंगा, मांजरा, मन्याड, कयाधू, आसना अशाच सर्वच मोठ्या व छोट्या नद्या पात्र सोडून वाहू लागल्या होत्या. सीमेला लागून असलेल्या पोचमपाड व श्रीरामसागर ही मोठी धरणं देखील पूर्णपणे भरली होती. त्यामुळे विनंती करुन पाणी सोडण्यास भाग पाडण्यात आले.
यावर्षी मात्र परिस्थिती उलट असून पाऊसमान कभी असल्याचा जाणकारांचा अंदाज आतापर्यंत तरी तंतोतंत खरा ठरला आहे. रविवारी (दि. ३०) पूर्व फाल्गुनी नक्षत्र लागले. परंतु अद्याप पावसाचे प्रमाण केवळ ५८.०२ टक्के आहे. सर्वाधिक ७७.६२ टक्के पाऊस मुदखेड तालुक्यात तर सर्वात कमी ४६.९८ टक्के पाऊस बिलोली तालुक्यात पडला आहे. अत्य सर्व तालुक्यांत ७० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस असल्याने खरिपाच्या पेरणीला तर धोका आहेच. परंतु परिस्थिती हीच राहिली तर रब्बीचा हंगाम घेण्याचा विचारही शेतकरी करु शकत नाहीत, असे चित्र आहे. दि. १ जून पासून दि. ३० ऑगस्टपर्यंत यंदा ५१७.१० मिलीमीटर पाऊस झाला असून गतवर्षी तो तब्बल ७२५.९० मिलीमीटर पडला होता.
यावर्षीच्या पावसाळ्यात जायकवाडीचे दरवाजे एकदाच उघडण्याची पाळी आली. सावधगिरी बाळगत या धरणात २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा राखण्यात आला असून ६ दलघमी या प्रमाणात येवा सुरू आहे. परंतु विसर्ग मात्र आतापर्यंत केवळ १६३.९२२ दलघमी एवढाच झाला. याशिवाय अन्य कोणत्याही मोठ्या जलाशयांतून यंदाच्या पावसाळ्यात आजवर विसर्ग झालेला नाही. विष्णुपुरी प्रकल्पातून मात्र १३.३८० दलघमी पाणी सोडण्यात आले. माजलगाव २३.९७, येलदरी ६२.४२, सिद्धेश्वर ३२.७७, लोअर दुथना २४.२४, अपर मानार ३७.५२, लोअर मानार ६१.४४, इसापूर धरणात ६८.५९ टक्के जलसाठा आहे.