The Congress is not weak; get to work with renewed vigour: MP Ravindra Chavan
नांदेड, पुढारी वृत्तसेवा नांदेड महानगरपालिका निवडणुकीत सत्त-राधाऱ्यांच्या दबावाला न जुमानता काँग्रेस उमेदवारांनी कडवी झुंज देत खिंड लढवली. काँग्रेस कमजोर नाही हे सिद्ध करून दाखवले. कार्यकर्त्यांनी धीर न सोडता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागावे असे आवाहन खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी केले.
नांदेड महानगरपालिका निवडणुकीतील नवनिर्वाचित दहा नगरसेवकांचा येथील काँग्रेस कार्यालयात भव्य सत्कार सोहळा पार पडला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी निवडणूक समन्वयक शाम दरक, जिल्हाध्यक्ष हणभंत पाटील बेटमोगरेकर, राजेश पावडे, अब्दुल सत्तार, सुरेंद्र घोडजकर, महेश देशमुख, केदार पाटील रमेश गोडबोले, सत्यपाल सावंत आनंद कल्याणकर, ललिता कुंभार, ज्योती कदम आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
ते म्हणाले धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा संघर्ष झाला. धनशक्तीला न जुमानता मतदारांनी काँग्रेसच्या दहा उमेदवारांना निवडून आणले. अनेक प्रभागात आमचे उमेदवार अगदी काठावर पराभूत झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
सत्ताधारी पक्षांनी या निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद अशा सर्व मार्गाचा अवलंब केला. तरीही काँग्रेस पक्षाने जिद्द व संघटनबळाच्या जोरावर कडवी झुंज दिली. अनेक प्रभागात मी स्वतः परिस्थितीचा आढावा घेतला काँग्रेसची परिस्थिती अत्यंत समाधानकारक होती, सर्वच कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. उमेदवारांच्या झंजावाती प्रचारामुळे विरोधी उमेदवारांना पडता भुई थोडी झाली. विरोधकांना सळो की पळो करून सोडले. अनेक उमेदवारांना आमिषे दाखवली परंतु आमच्या बहाद्दर उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला व प्रलोभनांना न जुमानता काँग्रेसची उमेदवारी कायम ठेवून निकराचा लढा दिला असे ते म्हणाले.
हा विजय कार्यकर्त्यांच्या विश्वासाचा मेहनतीचा, जनतेच्या असल्याचे सांगून खासदार चव्हाण यांनी काँग्रेस कधीच कमजोर नव्हती, आताही कमजोर नाही आणि यापुढेही कमजोर नसेल हा आत्मविश्वास घेऊन आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्ष अधिक जोमाने काम करून अभूतपूर्व यश प्राप्त करील., असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मनपा निवडणुकीतील यश-अपयशाबद्दल मंथन होणे गरजेचे आहे त्यासाठी लवकरच पक्षाची बैठक घेऊन आत्मपरीक्षण केले जाईल. कार्यकर्त्यांनी खचून न जाता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मरगळ झटकून कामाला लागावे.. ही कात टाकलेली काँग्रेस आहे. कार्यकर्त्यांच्या सर्व अडीअडचणी दूर केल्या जातील, अशी ग्वाही खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिली.