नांदेड ः नांदेड परिमंडळात परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात 2 लाख 3000 स्मार्ट वीज मीटर बसविण्यात आलेले आहेत. अचुक बिलिंगसह सवलतीच्या दरातील वीजबिलांचा फायदा स्मार्ट मीटरधारकांना होतो. सौर कालावधीतील वीज दर प्रति युनिट 80 पैसे ते 1 रुपयांपर्यंत कमी होत आहे.
सध्या सौरऊर्जा उत्पादन वाढत असल्याने सौर कालावधी अर्थात, दिवसाच्या कालावधीत होणाऱ्या वीज वापरापोटी ग्राहकांना सवलतीच्या दराने वीजपुरवठा करणे वीज नियामक आयोगाच्या नियमानुसार बंधनकारक आहे. दिवसाच्या कालावधीतील वीज वापर नोंदवणे टीओडी (टाईम ऑफ डे) स्मार्ट मीटरच्या माध्यमातूनच शक्य् आहे. त्यामुळे जून्या वीज मीटरच्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसविणे महावितरणसाठी अत्यावश्य्क असल्याने नांदेड परिमंडलासह संपूर्ण राज्यात दि. 9 ते 23 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ‘स्मार्ट मीटर पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे.
या कालावधीत अधिकाधिक संख्येने ग्राहकांना स्मार्ट मीटर पुरविण्यात येणार आहेत. विजेचे स्मार्ट मीटर हे विनामूल्य् असून त्याचा ग्राहकांवर कुठलाही आर्थिक भुर्दंड पडणार नाही. सौर कालावधीतील वीज वापर नोंदीसाठी सौर मीटरच उपयुक्त् असल्याने ग्राहकांची वीजबिलेही कमी होणार आहेत. स्मार्ट मीटरमुळे सरासरी व अंदाजित बिल आकारणीचे प्रमाणही शून्यावर येत आहे. पर्यायाने वीज बिलांच्या तक्रारी संपुष्टात येतील.
मागील काही महिन्यांपासून सर्व ग्राहकांच्या दारावर स्मार्ट मीटर बसविण्याचे काम नांदेड परिमंडलात सुरू असून त्या अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली विभागात 46 हजार, नांदेड जिल्ह्यातील भोकर विभागात 28 हजार 88, देगलूर विभागात 25 हजार 800, नांदेड शहरी विभागात 67 हजार 500, नांदेड ग्रामीण विभागात 40 हजार 766, परभणी जिल्ह्यातील परभणी विभागात 36 हजार 170 तर सेलू विभागात 19 हजार 582 ग्राहकांच्या दारावर टीओडी स्मार्ट मीटर बसविण्यात आलेले आहेत.
बसविण्यात येणारे मीटर्स हे प्री-पेड नसून जुन्या पध्दतीनुसार वीज वापरनंतर एक महिन्यांनंतरच त्याचे बिल भरावयाचे आहे. स्मार्ट मीटर बसविण्यात आलेल्या ग्राहकांना सौर कालावधीनुसार विजेच्या दरात सवलत देण्यात येत असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.