Farmer Killed by Sloth Bear Attack  Pudhari
नांदेड

Bear Attack Nanded | किनवट तालुक्यात अस्वलाचा हल्ला; शेतकरी ठार, ८ जण जखमी, चौघांची प्रकृती गंभीर

किनवट तालुक्यातील दयाळ धानोरा येथे मंगळवारी (दि.10) मध्यरात्री घटना

पुढारी वृत्तसेवा

Farmer Killed by Sloth Bear Attack

किनवट : किनवट तालुक्यातील दयाळ धानोरा येथे मंगळवारी (दि.10) मध्यरात्री चिडलेल्या अस्वलाने केलेल्या भीषण हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेड व संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने अस्वलाला पकडण्यासाठी विशेष पथकासह रेस्क्यू मोहीम सुरू केली आहे.

दत्ता बळीराम जाधव (वय ५५) हे मक्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेले असताना झुडपात दबा धरून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर झडप घातली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या ओरडण्याने मदतीला धावलेल्या इतर शेतकऱ्यांवरही अस्वलाने हल्ला चढवला.

यात रमेश बळीराम जाधव (४५), शंकर तानाजी जाधव (५०), सुदर्शन दत्ता पवार (३५), चंद्रसिंग शेषराव राठोड (३०) हे गंभीर जखमी झाले आहेत. अनुक्रमे पहिल्या तिघांवर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून चंद्रसिंग राठोड यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. तसेच पंडित जयसिंग जाधव (२२), विनोद शेषराव राठोड (३४), अरविंद शेषराव जाधव (३५) व संजय दत्ता जाधव (३०) हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर शिवणी येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात उपचार करण्यात आले.

गंभीर जखमी रमेश जाधव यांना जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले होते. पहाटे घटनेची माहिती मिळताच इस्लापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले, वन विकास महामंडळाचे अधिकारी चोले, तसेच स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष बालाजी आलेवार, प्रकाश जाधव, जेसीबी मालक संजय तोटावाड, चालक मोसम भाई व ग्रामस्थांनी मदतकार्य केले.

दोन दिवसांपूर्वी याच परिसरात अस्वलाचे पिल्लू मृतावस्थेत आढळले होते. वनविभागाने त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावली होती. मात्र, त्यानंतर योग्यप्रकारे जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या असत्या तर ही घटना टळली असती, अशी भावना ग्रामस्थांनी घटनास्थळी व्यक्त केली.

घटनेची माहिती आमदार भीमराव केराम यांना देण्यात आली असून, त्यांनी उपवनसंरक्षक केशव वाबळे आणि जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी संपर्क साधून मृत व जखमींच्या कुटुंबीयांना तातडीने मदत देण्याच्या सूचना केल्या. शासनाकडून आर्थिक सहाय्य दिले जाईल, अशी ग्वाही वन विभागाने दिली आहे.

उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक, इस्लापूर व बोधडी वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वन कर्मचारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत. वाशिम येथून विशेष पथक पाचारण करण्यात आले असून, परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. राज्यात वन्यप्राण्याकडून एकाच वेळी एवढ्या व्यक्तींवर झालेला हा हल्ला ही दुर्मिळ घटना मानली जात आहे. त्यामुळे दयाळ धानोरा व परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे सावट कायम आहे. शासनाने तातडीने नुकसानभरपाई व ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT