विशेष प्रतिनिधी
नांदेड ः नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) या काँग्रेसअंतर्गत विद्यार्थी संघटनेचे प्रदेश महासचिव गोविंद पाटील यांनी शिस्तभंग केल्याबद्दल संघटनेच्या संघटन सचिवांनी त्यांना नुकतीच कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर नांदेड काँग्रेसमधील शिस्तभंगाचा मुद्दा ऐरणीवर आला असून याच निमित्ताने स्थानिक पातळीवरील पक्षादेश मोडण्याच्या घटनांची जंत्रीच समोर आली आहे.
वरील संघटनेचे महासचिव पाटील हे नांदेडमध्ये वास्तव्यास असून विद्यार्थ्यांच्या वर्तुळात सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. संघटनेच्या प्रदेश कार्यालयाकडून त्यांना पाठविण्यात आलेल्या नोटिशी मागची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, नांदेडमध्ये गेल्या आठवड्यात धान्य महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी वृत्तवाहिन्यांच्या वार्ताहरांशी संवाद साधला.
या महोत्सवास हजर राहिलेले काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण हेही नंतर भाजपा खासदारांसोबत होते. भाजपा खासदार या नात्याने अशोक चव्हाण आपल्या पक्षाचे व पंतप्रधानांचे गोडवे गात असताना त्यांच्या शेजारी असलेले काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण त्यांच्या म्हणण्याला मान हलवत प्रतिसाद देताना दिसल्यानंतर याप्रसंगाची चित्रफीत समाजमाध्यमांत प्रसृत झाली होती.
गोविंद पाटील यांनी वरील चित्रफीत समाजमाध्यमांत प्रसारित केल्याच्या मुद्द्यावर आता आक्षेप घेण्यात आला आहे. एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे यांच्या सूचनेवरून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या प्रकरणाच्या निमित्ताने काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत.
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांनी बँकेचे उपाध्यक्षपद मिळविण्यासाठी खा.अशोक चव्हाण यांच्यासह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना विनवणी केली. त्यांची वारंवार भेट घेतली. त्यावेळी महाराष्ट्र काँग्रेसने कोणाला नोटीस पाठवली होती का, असा सवाल आता केला जात आहे.
मुखेड नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष स्वबळावर उतरलेला असताना या पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. नंतर शिंदे शिवसेनेच्या बॅनरवर खा.रवींद्र चव्हाण यांचा फोटो प्रकाशित झाला, त्यावेळी कोणालाही विचारणा झाली नाही. नंतर नांदेड मनपातील काँग्रेस नगरसेवक अब्दुल गफार यांनी मुंबईत जाऊन खा.अशोक चव्हाण यांची भेट घेतली व मनपातील विरोधी पक्षनेतेपद मिळावे, अशी विनंती केली. या भेटीचे वृत्त विविध वृत्तपत्रांत प्रसिद झाले; पण गफार यांना पक्षाकडून साधी विचारणाही झाली नाही.
नांदेड मनपाच्या स्वीकृत सदस्यपदासाठी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी ॲड.सुरेन्द्र घोडजकर यांचे नाव कळविले हेोते; पण स्थानिक नगरसेवकांनी निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारास स्वीकृत सदस्य केले. या मुद्द्यावर कोणावर कारवाई केली जाणार, असा सवाल केला जात आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बेटमोगरेकर यांनी त्यांना अधिकार नसताना वेगवेगळ्या तालुक्यात अध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या, या नियुक्त्यांचे पत्र खा.रवींद्र चव्हाण यांनी वितरित केले.
ही कृती शिस्तभंगांची नव्हती काय, असा सवाल करण्यात आला आहे. दरम्यान, गोविंद पाटील यांनी आपण खा.राहुल गांधी यांना मानणारे व त्यांचा आदर्श समोर ठेवून काम करणारे कार्यकर्ते आहोत, असे स्पष्ट करून संघटनेला माझी कृती चुकीची वाटत असेल, तर आपल्याला पदमुक्त करावे असे आपल्या खुलाशामध्ये कळविले आहे.
धान्य महोत्सवाच्या निमित्ताने भाजपा खासदार अशोक चव्हाण केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचे गोडवे गात होते. अशावेळी काँग्रेस खासदाराने राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतीचे प्रश्न, शेतमालाचे भाव इत्यादी वेगवेगळ्या मुद्द्यांवर केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल करावयास हवा होता. भाजपा खासदाराचे मत खोडून काढायला हवे होते; परंतु ते भाजपा खासदाराच्या वक्तव्यावर मान डोलवत होते, ही बाब पक्षशिस्तीत बसती काय?गोविंद अंभुरे पाटील, महासचिव, एनएसयूआय