नांदेड ः नांदेड-वर्धा रेल्वे मार्ग निर्मितीचे काम प्रगतीपथावर आहे. अर्धापूर तालुक्यात सुरु असलेल्या या कामासाठी पाटनूरच्या शिवारातून गौण खनिज उत्खनन सुरु आहे; परंतु येथील गौण खनिज वाहतूक करणाऱ्या हायवा सुसाट असून त्यांच्या गतीवर कुठल्याच प्रकारे नियंत्रण नसून महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियमानुसार हायवांवर ताडपत्री झाकली जात नसल्याने धूळ आणि पर्यावरणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. रॉयल्टीच्या नावाखाली वाहतूक नियमांवर बुलडोझर चालवले असून यावर पोलीस आणि महसूल विभागाने हात टेकले आहेत. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी लक्ष घालू, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
मागच्या तीन ते चार महिन्यापासून पाटनूर ता. अर्धापूर शिवारातून रेल्वेच्या कामासाठी मोठया प्रमाणात गौण खनिज उत्खनन सुरु आहे. पाटनूर-बारड-बारसगाव पाटी या मार्गे मोठ्या प्रमाणात हायवातून खडक वाहतूक सुरु आहे. या वाहनाच्या वेगावर नियंत्रण नसून पोलीस विभाग बघ्याची भुमिका घेत आहे. राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी खाजगी जागांवर मोठ्या प्रमाणात खडक उतरवून घेतला जात असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
उपरोक्त खडक वाहतूक करणाऱ्या एकाही वाहनावर ताडपत्री झाकली जात नाही. त्यामुळे नियमाला बगल दिल्याचे दिसून येते. यासंबंधी महसूल आणि पोलीस विभाग केवळ बघ्याची भूमिका घेतांना दिसून येत आहे. गेल्या चार महिन्यांत उपरोक्त वाहतुकीतील एकाही वाहनावर ताडपत्री झाकली गेली नसल्याने त्यावर आता दंड आकाराला जाणार का ? याकडे पर्यावरण प्रेमींचे लक्ष लागले आहे.
दंड आकारला जाणार का ?
महाराष्ट्रात गौण खनिज (वाळू, मुरुम, दगड) वाहतुकीसाठी महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम, 2013 आणि महाराष्ट्र जमीन महसूल (गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक) नियम, 1968 अंतर्गत वाहतूक करताना खडक किंवा वाळू ताडपत्रीने झाकणे अनिवार्य आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कलम 47 (7) व 47 (8) नुसार कठोर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे.